बीड: जातींमधील दुरावा संपवून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम करावे लागेल. कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा.आपण लोकांना कसं वागायचं सांगतो तेव्हा आपल्या अवतीभवती चुकीच्या प्रवृत्तीची असता कामा नये. एखादी गोष्टी लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्त्वाला मोजावी लागते, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते बुधवारी बीडच्या (Beed News) दौऱ्यावर आले असून ते आज जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या रोडमॅपबाबत सविस्तरपणे भाष्य केले.

Continues below advertisement

मी सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत काम केले. त्यामुळे मला सुदैवाने अनेक गोष्टींचा अनुभव आहे. माझ्या भागात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील लोकांच्या कामाच्या पद्धतीमध्ये फार तफावत आहे. मी इकडे आलो तेव्हा मला एका कार्यकर्त्याने, इकडे या पद्धतीने चालतं, त्या पद्धतीने काम चालतं, असे सांगितले. पण आपण सवय लावू, तसे घडते, असे सांगत बीड जिल्ह्यातील कार्यपद्धती बदलण्याचे संकेत दिले. 

बीड जिल्ह्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. पुढच्या ट्रिपला मी कदाचित डीपीडीसीची बैठक घेऊन, कदाचित त्यानंतरच्या ट्रिपलाही बैठक होईल. पण सध्या मला योग्य वाटतात ती कामं मतदारसंघात मंजूर करायची आहेत. या कामांचा दर्जाही मला पाहायचा आहे. अनेकजण माझ्याकडे निधीसाठी येतात. दादा आम्हाला 10 लाखांचा निधी द्या, म्हणतात. पण मी ई-टेंडर काढणार आहे, यामध्ये 15 लाखांपर्यंतच्या कामांना मंजुरी देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Continues below advertisement

अनेकांनी बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलं पण रेल्वे का आली नाही? अजित पवारांचा सवाल

आजपर्यंत अनेकांनी बीड जिल्ह्याचे नेतृत्व केले. सुदैवाने सध्या राज्याचे अर्थखाते माझ्याकडे आहे. बीडमध्ये एका विमानतळाची गरज आहे. दुर्दैवाने आतापर्यंत ते झालं नाही. बीडला जायचं असेल तर एकतर लातूरला उतरावं लागतं किंवा नांदेड, छत्रपती संभाजीनगरला उतरुन यावं लागतं. जिल्ह्यात विमानतळ असेल तर अधिकारी, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना यायला सोपं असतं, असे अजित पवार यांनी म्हटले.

बीडमध्ये रेल्वेचं काम किती वर्षे चाललं आहे, हा प्रश्न बीडकरांनी स्वत:ला विचारला पाहिजे. बीडमध्ये रेल्वे यायला इतका विलंब झाला, त्याला जबाबदार कोण? कोणीतरी याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. कोणीतरी येणार आणि जादूची कांडी फिरवून काम करणार, असं होत नसतं. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. मी आता माझ्या एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. मंत्रालयातही सेक्रेटरी लेव्हलचा माणूस नेमला आहे. या माध्यमातून पाणी, वीज, बीडमधील राष्ट्रीय महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, विमानतळ यावर देखरेख ठेवली जात आहे. मी आता बीडमध्ये इनक्युबिशन आणि इनोव्हेशन सेंटर सुरु करण्याच्या विचारात आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात 200 कोटींची गुंतवणूक येईल. त्यापैकी 165 कोटी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आणणार आहे, 35 कोटी राज्य सरकारकडून आणण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे. या सेंटरमध्ये बीडमधील तरुण-तरुणींना नवीन प्रशिक्षण द्यायचं आहे. आता कॉमर्स आणि आर्टसच्या डिग्रीला तितकसं महत्त्वं उरलेलं नाही. आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील संधी वाढल्या आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

शेतीत एआयचा वापर केल्यास उत्पन्नात  प्रचंड वाढ: अजित पवार

शेतकऱ्यांनी आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर शेतीत केला पाहिजे. फळबागांमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर एआयच्या वापराशिवाय गत्यंतर नाही. बारामतीमध्ये याचं एक प्रात्यक्षिक झालं. त्याठिकाणी 60 टन उत्पादन होणाऱ्या शेतात ऊसाचं उत्पादन 90 ते 100 टनांवर गेले. पारंपरिक पद्धतीने ऊसाला खत टाकताना बरेसचे खत ऊसाच्या पात्यांमध्ये अडकते. तर कधीकधी ऊसाला एवढे पाणी दिले जाते की, जमीन क्षारयुक्त होऊ जाते. मात्र, एआयच्या वापरामुळे पाण्याची आणि खताचा योग्य वापर करता येतो. जमिनीला जेव्हा पाण्याची आणि खताची गरज असते तेव्हा एआय शेतकऱ्याच्या मोबाईलवर मेसेज पाठवते, असे अजित पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा

राख गँगला सुतासारखं सरळ करणार, बीडमध्ये जाऊन अजित पवारांनी दम भरला, मराठा-वंजारी वादावरुनही खडसावलं