बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांच्यानंतरचा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याने सीआयडीला दिलेला जबाब हाती लागला आहे. सुदर्शन घुलेच्या कबुली जबाबातून आणखी एक मुद्दा समोर आला आहे. मारहाण होत असताना चाटेशी दोनदा बोलणे झाल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. त्याचबरोबर प्रतीक घुले यानेच सरपंच संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी केली होती. त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवर उडी मारली. त्यामुळे त्यांनी रक्ताची उलटी केली, असंही त्याने म्हटलं आहे. तसेच मारहाण करताना दोन वेळा विष्णू चाटे याच्याशी मोबाईलवरून बोलणं झाल्याचंही त्याने कबूल केले आहे. तर मारहाण केल्यानंतर आरोपींना संतोष देशमुख यांना मारहाण केल्याने ते निपचित पडले होते. ते मयत झाल्याचा त्यांचा संशय होता. त्यामुळे जयराम चाटे याला देशमुखांना कपडे घालण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून आम्ही सर्व तुरीच्या शेतात लपून अंधार पडण्याची वाट पाहत होतो,अशी माहिती त्यांनी दिली आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे असे एकत्र आले आणि सरपंच देशमुख यांच्या अपहरणाचा प्लॅन झाला. कृष्णाने एक कार भाड्याने आणली होती. तर सुदर्शनकडे अगोदरच काळी जीप होती. देशमुख आणि त्यांचा मावसभाऊ दोघेजण कारमधून येत असल्याचे दिसताच एक मागे आणि दुसरी पुढे अशा दोन्ही गाड्या लावून त्यांना अडविले. त्यानंतर दगडाने काच फोडून सरपंचाला बाहेर काढले. गॅसच्या पाईपने मारहाण केली. तर सोबतच्याला कोयत्याचा धाक दाखवून दुपारी ३ वाजता उमरी टोलनाक्यावरून देशमुखांचे अपहरण केले. त्यानंतर त्याला टाकळी शिवारात नेऊन मारहाण केली. यात सरपंचाचा मृत्यू झाला.
वाल्मीक कराडचा निरोप
खंडणी न दिल्यानेच वाल्मीक कराड याने आडवा येणाऱ्याला आडवा करा असा निरोप दिला होता. त्याप्रमाणेच आम्ही सरपंच संतोष देशमुखांना मारहाण केली. याचवेळी विष्णू चाटे याला जयराम चाटेच्या फोनवरून दोन वेळेला बोलणं झाल्याची कबुली सुदर्शन घुलेने दिली आहे.
अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपले
संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केल्याने ते निपचित पडले होते. ते मयत झाल्याचा आरोपींना संशय आला होता. त्यामुळे जयराम चाटे याला देशमुखांना कपडे घालण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून आम्ही सर्व तुरीच्या शेतात लपून अंधार पडण्याची वाट पाहत होतो. अंधार पडताच मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून दिला आणि वाशीच्या दिशेने निघून गेलोत, असेही सुदर्शन घुलेने आपल्या जबाबात म्हटले आहे.
दोन तास मारहाण
क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप, लाकडी काठी अशा हत्यारांनी आम्ही सर्वजण दोन तास देशमुख यांना मारहाण करत होतो, अशी कबुली सुदर्शन घुले याने दिल्याची माहिती आहे.