मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. या मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले आहेत. औरंगाबादचा हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक होता. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव या मतदारसंघातून अपक्ष लढले होते. त्यांच्यामुळेच खैरेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहेत. जाधवांना या निवडणुकीसाठी त्यांचे सासरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मदत केल्याचा आरोप होत आहे.


शिवसेना-भाजपची युती असूनही दानवेंनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधक उमेदवाराला मदत केल्याचे बोलले जात आहे. परंतु याप्रकरणी आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे म्हणणे मांडले. पाटील म्हणाले की, "शिवसेनेचे चंद्रकांत खैरे शिवसेनेच्याच माजी आमदारामुळे (हर्षवर्धन जाधव) निवडणूक हरले. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जावयाला मदत केली नव्हती."

औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना 3 लाख 83 हजार 759 मतं मिळाली होती, तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी 3 लाख 89 हजार 42 मतं मिळवत विजय साजरा केला. तर अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधव यांना 2 लाख 73 हजार 237 मतं मिळाली होती.