औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असे मत औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.


मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावं ही मागणी मला तळागाळातुन येत आहे. यासाठी भाजप- शिवसेना सरकारने जर एका महिन्यात यावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच प्रकाश आंबेडकर यांना भेटणार असल्याचे देखील जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.

मला औरंगाबाद लोकसभेत 2 लक्ष 83 हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत. जर मराठा आरक्षण कायदा झाला नाहीतर मराठा समाज वंचित आघाडीसोबत दिसेल, असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.

औंरंगाबादेत 'ट्रॅक्टर'चा फॅक्टर महत्वाचा ठरला
शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवत खैरेंना थेट आव्हान दिले. 'ट्रॅक्टर' ही निशाणी घेऊन मैदानात उतरलेल्या जाधव यांनी 2 लाख 83 हजारांपेक्षा जास्त मतं घेतली. चंद्रकांत खैरेंना याचाच फटका बसला आणि त्यांचा पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत जावयाला मदत केली असा आरोप देखील खैरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची देखील बरीच चर्चा झाली. गेली 20 वर्षे औरंगाबादचं खासदारपद भुषवणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करत वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिलेले एमआयएमचे इम्तियाज जलील 3 लाख 88 हजार 957 मतं घेत औरंगाबादचे खासदार म्हणून विजयी झाले. चंद्रकांत खैरेंचा त्यांनी 4 हजार 679 मतांनी पराभव केला.

1999 पासून सलग चार वेळा औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे लोकसभेवर निवडून गेले आहेत. सलग वीस वर्षे खासदार राहिलेल्या खैरेंना यावेळी एमआयएमच्या इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचं आव्हान होतं. त्यासोबतच काँग्रेसकडून सुभाष झांबड यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीत चर्चा चंद्रकांत खैरे, हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांचीच होती.