Marathwada Compensation: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचे नुकसान झालं आहे. महसूल यंत्रणा व कृषि विभागाकडून बहुतांश पंचनामे सुद्धा करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद विभागामध्ये 1 जुन ते 19 ऑगस्ट 2022 दरम्यान 570.80 मि.मी. पाऊस पडला असून सरासरी पाऊसाच्या तुलनेत 130.11 टक्के इतका पाऊस पडलेला आहे. एकुण 52 दिवसामध्ये हा पाऊस पडलेला आहे. औरंगाबाद विभागात एकुण 450 महसूल मंडळे असून त्यापैकी 207 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे.


अशी झाली पेरणी...


औरंगाबाद विभागात सरासरी खरीप पेरणी क्षेत्र 48.57 लाख हेक्टर असून सन 2022-23 मध्ये 47.99 लाख हेक्टर क्षेत्रावर 98.80 टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची 2450056.42 हेक्टर क्षेत्रावर व कापूस पिकाची 1372886.82 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.


नुकसान भरपाईपोटी हवे 405 कोटी 


औरंगाबाद विभागामध्ये जुन ते जुलै 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे एकुण 8,11,845 शेतकरी बाधित झालेले असून 5,87,466.41 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राच्या नुकसान भरपाईपोटी 403.58 कोटी रकमेची आवश्यकता आहे. तसेच 489.11 हेक्टर शेतजमीन खरडून / वाहून गेली  असून त्याचा नुकसान भरपाईपोटी 1.43 कोटी रकमेची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे मराठवाड्यातील नुकसानभरपाईसाठी एकूण 405 कोटी हवे आहेत.


शेतकऱ्यांनी भरला पिक विमा 


प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 (pradhan mantri pik bima yojana 2022 maharashtra) मध्ये औरंगाबाद विभागात एकुण 66,30,913 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून 35,21,449 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे एकुण 1,80,017 पूर्व सूचना प्राप्त झालेल्या आहेत.


उर्वरीत पंचनामे करण्याचे आदेश: कृषिमंत्री 


जुलै पर्यंत झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झालेले आहेत. तथापि जुलै नंतरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात पाचवेळा तर काही मंडळात तीन वेळा तर काही मंडळात दोनवेळा अतिवृष्टी झाली. एकाच हंगामात पाच-पाच वेळा जर अतिवृष्टी होत असेल तर स्वाभाविकच या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात घ्यावे लागेल. उर्वरीत पंचनामे अधिक गतीने पूर्ण करणे हे अत्यावश्यक असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यात दक्षता घेऊन तात्काळ नियोजन करावे, असे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.