Aurangabad Corona Update: चीनमध्ये (China) कोरोनाचा उद्रेक (Coronavirus Outbreak) पाहायला मिळत असतानाच आता जगभरातील इतर देशात देखील कोरोनाचे आकडे वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतात देखील खबरदारी घेतली जात असून, केंद्राकडून पुन्हा एकदा लसीकरणावर भर देण्याबाबत सूचना करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) लसीकरणाला (Vaccination) प्रतिसाद मिळत नसल्याने, शासनाकडून पुरवठा झालेल्या सुमारे 56 हजार कोव्हॅक्सिनचे डोस (Covaxin vaccine) 31 डिसेंबरनंतर एक्स्पायर होणार आहेत. 


चीन, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोविड पुन्हा एकदा थैमान घालतांना दिसत आहे. चीनमध्ये तर मृत्यूसंख्येतही मोठी वाढ दिसून येत आहे. अशा परिस्थितीत जगभरातील देशांनी सतर्कतेसाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. केंद्र शासनानेही कोविड टेस्ट आणि लसीकरणावर भर देण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला दिले आहेत. मात्र असे असतानाच मागील काळात कोरोना महामारीची परिस्थिती निवळली असल्याचा समज करत नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेल्या लसी तशाच पडून आहे. तर आता यातील 56  हजार कोव्हॅक्सिनचे डोस 31  डिसेंबरनंतर एक्स्पायर होणार आहेत. 


जिल्ह्यातील लसीकरण परिस्थिती 



  • एकूण उद्दिष्ट: 35  लाख 76738

  • पहिला डोस घेतलेल्यांची संख्या:  30  लाख 56  हजार 325 (85 टक्के)

  • दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या:  24 लाख 1 हजार 532. (67.14 टक्के)

  • बुस्टर डोस घेतलेल्यांची संख्या: 2 लाख 71 हजार 62 (20.89 टक्के).


आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन... 


केंद्र शासनाने आरटीपीसीआर व अॅन्टिजेन चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. ताप, सर्दी, यासह कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांची टेस्ट करावी. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या पालकांनी 12  ते 18  वयोगटातील सर्व मुलांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस द्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी केले आहे.


कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश...


दरम्यान केंद्राच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासन देखील कोरोनाच्या बाबतीत अलर्ट झालं आहे. जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,आयुर्वेदिक दवाखाने, युनानी दवाखाने, फिरते आरोग्य पथक यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक पत्र पाठवले आहेत.  ज्यात सद्यस्थितीत कोविड चाचण्यांची आकडेवारी प्रतिदिन सुमारे 20 ते 25 असून ही चाचण्यांची आकडेवारी असमाधानकारक असल्याच म्हटले आहे. त्यामुळे यापुढे प्रतिदिन किमान 50 अँटीजेन, आरटीपीसीआर आणि पीएचसी चाचण्या (Test) चे उद्दष्टे ठेवून चाचण्यांचे प्रमाण वाढविणे अपेक्षित असल्याच देखील या पत्रात म्हटले आहे. 


Aurangabad: गर्भपात करण्यासाठी पत्नीला खाऊ घातल्या गरजेपेक्षा जास्तीच्या गोळ्या, रक्तस्त्राव होऊन गेला जीव