Aurangabad Police Patil Recruitment: औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आदेश काढले आहे. सोबतच बीड जिल्ह्यात 1 हजार 484 ठिकाणी पोलीस पाटलांची निवड केली जाणार असल्याचे आदेश बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाविरोध शर्मा काढले आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटील पडे भरण्याची मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली होती. 

औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठया संख्येने पदे रिक्त असल्या कारणाने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अशी अडचण निर्माण होऊन गावातील अपराधाचे प्रमाण वाढु नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राहिल, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल, यादृष्टीकोनातून पोलीस पाटीलांची सदर रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. या करीता जिल्हयामध्ये एकसूत्रीपणा असावा या दृष्टीकोनातून पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस पाटील भरतीचे निर्देश देत असल्याचं जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

बीड जिल्ह्यातीलही पद भरणार 

बीड जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस पाटील भरतीचे आदेश काढले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 1  हजार 600 पोलीस पाटलांच्या जागा असून, प्रत्यक्षात114 पोलीस पाटीलच कार्यरत आहे. जिल्ह्यात 1 हजार 484 जागा रिक्त असल्याने पोलीस पाटलांच्या निवडी करण्याची मागणी क्षीरसागर यांनी केली होती. त्यांच्या याच मागणीनंतर बीडचे जिल्हाधिकारी राधाविरोध शर्मा यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीचे आदेश काढले आहे. यामध्ये आता जिल्ह्यात 1 हजार 484 ठिकाणी पोलीस पाटलांची निवड केली जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती वेळापत्रक 

अ.क्र. भरती प्रकियेचे टप्पे  कार्यवाहीचा कालावधी 
1 उपविभागीय अधिकारी यांनी रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे  5 जानेवारी 2023 पर्यंत 
2 बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे  06 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 पर्यंत 
3 गावनिहाय आरक्षण निश्चित करणे  21 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2023 पर्यंत 
जाहिरात प्रसिद्ध करणे  06 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत 
5 अर्ज मागविणे  21 फेब्रुवारी ते 08 मार्च 2023 पर्यंत 
6 अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र पाठविणे  09 मार्च ते 23 मार्च 2023 पर्यंत 
7 लेखी परीक्षा घेणे   29 मार्च रोजी 
78 पत्र उमेदवारांची तोंडी परीक्षा (मुलाखती) घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे  15 एप्रिल रोजी 
9 पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देणे  26 एप्रिल रोजी 


पोलीस पाटलांचे कर्तव्य...

गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. गावपातळीवर तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देण्याचे काम पोलीस पाटील करतात. नैसर्गिक आपत्ती, रोगराई अशा गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देण्याचे काम देखील त्यांच्याकडे असते. कार्यक्षेत्रातील गावातील अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देण्याचे काम पाटील करतात. यासोबतच सण, उत्सव, यात्रा, राजकारण, निवडणुका दरम्यान गावातील घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवत याबाबत वेळोवेळी पोलिसांना माहिती देण्याचे काम देखील पोलीस पाटील करतात. त्यामुळे ग्रामीण भागात पोलीस पाटालांवर मोठी जबाबदारी असते.