औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपल्याला कोणतीही मदत केली नाही, असा दावा दानवेंचे जावई आणि औरंगाबादेतून अपक्ष रिंगणात उतरलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. मात्र हर्षवर्धन जाधवांची प्रचारादरम्यानची एक क्लिप वायरल झाल्याने सासरेबुवा अडचणीत आले आहेत. औरंगाबादेतील शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दानवेंवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप केल्यानंतर युतीत कलह निर्माण झाला आहे.


हर्षवर्धन जाधव यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. दानवेंनीच पूर्ण भाजप माझ्यामागे उभं करण्याचं आश्वासन दिलं होतं, असा दावा हर्षवर्धन जाधवांनी केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

दानवेंनी युतीधर्म न पाळता जावईधर्म पाळल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला होता. खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती.

VIDEO | जावयासाठी रावसाहेब दानवेंनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला? | औरंगाबाद | स्पेशल रिपोर्ट



काय म्हणाले होते खैरे?

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे हे भाजप-शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तरीही रावसाहेब दानवे यांचे जावई आणि शिव स्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात उतरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही रावसाहेब दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना रोखलं नाही. जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी दानवेंविरुद्ध निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे यांनी अर्जुन खोतकर यांची समजूत काढून त्यांना बंडखोरीपासून रोखंलं. मात्र दानवेंनी या सहकार्याची जाणीव ठेवली नाही आणि जावयालाही आवरलं नाही, अशी तक्रार चंद्रकांत खैरेंनी केली.

भाजपचं स्पष्टीकरण

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी प्रयत्न केले आणि युतीधर्माचे पालन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेवरुन आपण स्वतः या मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करुन खैरेंच्या विजयासाठी भाजप नेते-कार्यकर्त्यांशी संपर्क केला आणि पत्रकार परिषद घेऊन जाहीर आवाहनही केलं, असा दावा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी शुक्रवारी केला.

कार्यकर्त्यांनी भूलथापांना बळी न पडता चंद्रकांत खैरे यांना विजयी करावं, असं सांगितल्याचंही ठाकूर म्हणाले. दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा असल्याचा गैरसमज काही जणांनी निर्माण केला होता. त्याबाबत आपण पत्रकार परिषदेत जाहीरपणे पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आणि संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन केल्याचंही यावेळी ठाकूर यांनी सांगितलं.