औरंगाबाद : औरंगाबादमध्ये विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या दोन चिमुरड्यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीनेच पोटच्या मुलांचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे.


औरंगाबादेतील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी दोन मुलं मृतावस्थेत आढळली होती. बायकोशी झालेलं भांडण आणि दोन मुलांना खाऊ खालण्याच्या विवंचनेतून पित्यानेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे.

संतोष वाळूंजे असं या निष्ठूर बापाचं नाव आहे. संतोष आणि पत्नीचे सतत वाद होत असल्यामुळे त्याने दोन मुलांना घेऊन घर सोडलं होतं. अशात दोन्ही मुलं भूकेने व्याकूळ झाली होती. मात्र संतोषच्या खिशात पैसे नसल्याने तो त्यांना खाण्यासाठी काहीही घेऊ शकला नाही.

अखेर, संतोषने गणेश आणि कृष्णा या दोघा मुलांना थेट विहिरीत ढकलून देऊन त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेतलं.