औरंगाबाद : ऐतिहासिक वारसा ही आपल्या शहराची, परिणामी देशाचीही ओळख असते. तिच्या सुरक्षेसोबतच संवर्धनाचीही तितकीच काळजी घेणं हे आपल्या पुरातत्व खात्याचं, पर्यटन विभागाचं कर्तव्य आहे. ऐतिहासिक वारस्यांपैकी एक असलेल्या औरंगाबादच्या 'बिबी का मकबरा'ची वाताहत पाहून तरी पुरातत्व विभागाचे डोळे उघडणार का? हा प्रश्न आहे.


खपली निघालेले मिनार, काळवंडलेला मकबरा, पुसट झालेलं नक्षीकाम... महाराष्ट्राचा 'ताज महाल' अशी ख्याती असलेल्या, औरंगाबादचं वैभव असलेल्या 'बिबी का मकबरा'ची पडझड झाली आहे. 1679 मध्ये औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला हा ऐतिहासिक ठेवा. हा मकबरा पाहण्यासाठी देशभरातून हजारो नागरिक इथे येतात

बिबी का मकबरा, अजिंठा-वेरूळा यांसारख्या ऐतिहासिक वारस्यांनी औरंगाबाद पर्यटनाची राजधानी झाली आहे. इतिहासकालीन लाल-काळे दगड, संगमरवर आणि पांढऱ्या मातीपासून साकारलेल्या या ऐतिहासिक ठेव्याची पडझड होत असताना पुरातत्व विभाग झोपा काढतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही महिन्यांपूर्वी कुतूबमिनारचा मनोरा ढासळला. जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताज महालही पिवळट दिसू लागला आहे. त्यामुळे आपलं पर्यटन खातं, पुरातत्व विभाग करतं तरी काय, हाच प्रश्न आहे