अमरावती :  बीड  (Beed News) शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी 30 ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मराठा समाजाचे (Maratha Reservation)  नेते मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांच्या उपोषण आंदोलनामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलने होत आहेत. सरसकट कुणबी दाखल्यांच्या (Kunbi Certificate)  त्यांच्या मागणीला ओबीसींचा विरोध असून मराठा समाज आणि ओबीसी समाज आमनेसामने आले आहेत. बीडमध्ये ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता, असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)  केला आहे. तसेच बीडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती जानेवारी महिन्यात अनेक ठिकाणी दिसेल, असेही ते यावेळी म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.


रोहित पवार म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली. या दंगलीचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला बघावा लागला होता. या दंगलीमुळे मोठ्या प्रमाणावर मतांचे विभाजन झाले होते.  यंदाच्या लोकसभा निवडणुकीअगोदर ओबीसी विरुद्ध मराठा आता पुढे येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे दंगल हे वातावरण का केलं जात आहे याचा लोक विचार करायला लागले आहे.  बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता.बीडमध्ये जशी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये होती तशी परिस्थिती जानेवारी महिन्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यात केली जाणार आहे. 


संविधान टिकवण्यासाठी भाजपला बाहेर ठेवावे लागेल


रोहित पवार यांनी या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार उभे न करण्याचे आवाहन केले आहे. रोहित पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला मी विनंती करतो की, संविधान टिकवायचं असेल तर भाजपला आपल्याला बाहेर ठेवावे लागेल. त्यामुळे अशा उमेदवारांना उभं नका करू जेणेकरून त्याचा लाभ भाजपला होईल. सगळ्यांना मिळून ही लढाई लढावी. 


अजित पवारांच्या दाव्यावर रोहित पवारांचे उत्तर 


भाजपसोबत जाण्याचं शरद पवारांनी कधी सांगितलं नव्हतं तसं असतं तर संपूर्ण पक्ष भाजपसोबत असता, असं आमदार रोहित पवार म्हणाले. अजित पवार गटाच्या शिबिरात अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. भाजप सोबत जाण्याची इच्छा कोणाची आणि कशासाठी होती हे सर्वांना माहिती आहे, असंही रोहित पवार म्हणाले. 


हे ही वाचा :


Prakash Solanke : राजकीय विरोधकांनी माझ्या घरावर हल्ला केला, अधिकार असतानाही पोलिसांनी जमावाला पांगवलं नाही, प्रकाश सोळंके यांचा आरोप