जळगाव: शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे गट गुवाहाटीला (Eknath Shinde Guwahati Visit) गेला, तिथून परत आल्यानंतर शिंदे थेट मुख्यमंत्रीच झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेली गुवाहाटीची चर्चा आता वर्ष होऊन गेलं तरीही संपत नाही. त्याच गुवाहाटीच्या विषयावर आता प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडूंनी  (Bacchu Kadu) प्रतिक्रिया दिली आहे. गुवाहाटीला गेलो म्हणून बदनाम झालो, घराबाहेर पडलो की लोक खोके घेतले म्हणतात असं ते म्हणाले. जिकडे जातो तिकडे खोके घेऊन आलास असं लोक आम्हाला म्हणतात असंही ते म्हणाले. 


आज जळगाव दिव्यांग विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी भाषणात बच्चू कडू यांनी त्यांचं मत मांडत भूमिका स्पष्ट केली.


... पण बदनामीची भीती नाही


आमदार बच्चू कडू म्हणाले की, गुवाहाटीला जाऊन आल्यानंतर बदनाम झालो. जिकडे जातो तिकडे लोक म्हणतात की खोके घेऊन आला. घराबाहेर पडलो की खोके घेऊन आला असं म्हणतात आणि आमची बदनामी करतात. पण मला बदनामीची फिकर नाही. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं नसतं.


गुवाहाटीला गेलो म्हणून दिव्यांग मंत्रालय मिळालं


एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घटनाक्रम तसेच कारण देखील यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. बच्चू कडू म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वर्षे राहिल्यानंतरही दिव्यांग मंत्रालय झालं नाही. म्हणून मी एकनाथ शिंदे यांना अट घातली होती जर तुम्ही मला दिव्यांग मंत्रालय देत असाल तरच मी तुमच्यासोबत येतो. नाहीतर गाडीतून खाली उतरतो. त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि आज दिव्यांग मंत्रालय आपल्याला मिळालं आहे."


दुसऱ्या वेळी जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांना दिव्यांग मंत्रालयाबाबत आठवण करून दिली होती. त्यानंतर ते दिव्यांग मंत्रालय आपल्याला मिळालं असंही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.


ही बातमी वाचा: