मुंबई: उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ पुखराया येथे सकाळी 3.10 वाजण्याच्या सुमारास इंदूर-पाटणा एकस्प्रेसचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेनचे 14 डबे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत अत्तापर्यंत 97 जणांचा मृत्यू तर 200 जण जखमी झाल्याचे डीजीपी जावीद अहमद यांनी सांगितले आहे.


या अपघातावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला. ट्विटरवर अमिताभ यांनी लिहले आहे की, ''इंदूर-पाटणा रेल्वे अपघाचे फोटो पाहून अतिव दु:ख झाले असून या अपघातावर शोक व्यक्त करण्यासाठी शब्द अपूरे पडत आहेत. या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो''

या अपघातात रेल्वेचे 6 स्लीपर आणि 3 एसी कोचच्या डब्याची दुरावस्था झाली आहे. अधिक माहितीनुसार, कोच एस-1 आणि एस-3 या डब्यांना सर्वाधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.