Ravikant Tupakr Released : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह 25 कार्यकर्त्यांची अकोला जिल्हा कारागृहातून सुटका झाली आहे. काल (15 फेब्रुवारी) बुलढाणा न्यायालयाने (Buldana) तुपकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला होता. आज (16 फेब्रुवारी) सकाळी त्यांची सुटका झाली आहे. कारागृहाबाहेर आई आणि पत्नीने औक्षण करुन रविकांत तुपकर यांचे स्वागत केले.


रविकांत तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांची अकोला न्यायालयातून सुटका


रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह त्यांच्या 25 सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयाने (Buldhana Court) कालच (15 फेब्रुवारी) दिलासा दिला होता. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना न्यायालयाने अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला होता. 11 फेब्रुवारीला झालेल्या आंदोलनात रविकांत तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत होते. आज अखेर या सर्वांची सुटका झाली आहे. आंदोलनात झालेल्या राड्यानंतर तुपकरांसह 40 हून अधिक कार्यकर्त्यांवर दंगलीचे गुन्हे झाले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांची अकोला कारागृहात रवानगी झाली होती.


11 फेब्रुवारीला झाली होती अटक 


कापूस सोयाबीनसह पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरुन शनिवारी (11 फेब्रुवारी) स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात संघर्ष देखील झाला होता. त्यानंतर तुपकरांसह 25 सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आत्मदहन आंदोलनाच्या दणक्याने 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आलं आहे.


Ravikant Tupkar : तुपकरांच्या नेमक्या मागण्या काय?


सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलं होतं. हजारो शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्यावर उतरत आहेत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले होतं. तसेच, अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुंगातही अन्नत्याग आंदोलनावर ठाम