Ramdas Athawale : आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून 2 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) म्हणजेच एनडीएचे नेतृत्व याबाबत सकारात्मक आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale)  हे स्वतः लोकसभा लढवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक सोमवारी (दि.5) पार पडली. या बैठकीला रामदास आठवले देखील उपस्थित होते. त्यामुळे आरपीआय 2 जागा लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 


शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्याची रामदास आठवले इच्छुक 


शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे सध्या शिर्डी या मतदारसंघाचे खासदार आहेत. या जागेसाठी रामदास आठवले इच्छुक आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात अनेक मात्तबर नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत. राधाकृष्ण विखे पाटील,बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे आणि मधुकर पिचड या नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ शिर्डी या मतदारसंघात आहे. त्यामुळे रामदास आठवलेंना विधानसभा मतदारसंघातील आमदार पाठिंबा देणार का? आणि एनडीकडूनही त्यांना शिर्डीची जागा दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


शिर्डी मतदारसंघात आठवलेंचा झाला होता पराभव 


रामदास आठवलेंनी 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यामुळे आठवलेंचा पराभव झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता विखे-पाटील देखील महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे रामदास आठवलेंना शिर्डीची जागा मिळणार का? आणि मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


देशाभरात 25 जागा लढवणार असल्याची घोषणा आठवलेंनी केली होती


मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभेच्या देशभरात 25 जागा लढवणार असल्याची घोषणा डिसेंबर महिन्यात केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) रिपब्लिकन पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला पाठींबा असणार आहे, असे रामदास आठवलेंनी स्पष्ट केले होते. भाजपने रामदास आठवले यांना दोन वेळेस राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. शिवाय, मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या काळात त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ देखील पडली होती. 


Uddhav Thackeray : ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका