अहमदनगर : अहमदनगरच्या प्रवरा नदीत स्वातंत्र्य दिनाच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास  एक पिकअप व्हॅन वाहून गेली आहे.  यात तीनजण असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एक जण बचावला असून दोघे मात्र अजूनही बेपत्ता आहे. विशेष म्हणजे बचावलेल्या तरुणाने रात्रीतून थेट नाशिक गाठले त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाजवळी ही घटना घडली आहे. 


 संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाजवळ असणाऱ्या प्रवरा नदीच्या पुलावर आज सकाळी नेहमीप्रमाणे ये जा सुरू असताना काही जणांना पुलाचा एक कठडा तुटला असल्याच लक्षात आलं. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर एखादं मोठं वाहन प्रवरा नदीपात्रात पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेची चर्चा वाढल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी ही तात्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली मात्र गाडी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती त्यांना समजली असली तरी गाडीत नक्की किती जण होते याबाबत माहिती मिळत नव्हती.


 घटना घडून 16 तास उलटले तरी नदीला पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्यानं बचावकार्य करण्यात अडचणी येत होत्या.  NDRF टीमला सुद्धा मदतकार्यासाठी बोलावण्यात आले आणि दुपारी 4 वाजता थेट गाडीत वाहून गेल्यानंतर घटनेत बचवलेला अमोल खंदारे हा तरुणच समोर आल्यानंतर घटनेची खरी माहिती समोर आली आहे.. या घटनेत वाहनासह चालक प्रकाश सदावर्ते सुभाष खंदारे मात्र बेपत्ता आहे.


सदर घटना घडल्यानंतर घडलेला प्रकार अमोलने सांगितला.  रात्री बचावल्यानंतर सहकार्यांना आवाज देऊन प्रतिसाद न मिळाल्यानं घाबरलेल्या अमोलने पोलिसांना न कळवता जोर्वे ते संगमनेर हे 10 किमी अंतर पायी चालत येऊन संगमनेरहून ट्रकमधून पहाटे थेट नाशिकला आपले घर गाठले.   या घटनेत पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं रेस्क्यू करण्यात अडचणी आहेत त्यामुळे आज रात्री पाण्याचा प्रवाह कमी करून उद्या सकाळी रेस्क्यू केले जाणार असून NDRF ची टीम सुद्धा येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी सांगितली आहे