Ahmednagar Accident : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात (Accident) सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, एकाचा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला असल्याची प्रथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. तर, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर-एसटी बस आणि इको गाडी यांच्यामध्ये ढवळपुरी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. मुंबईकडून नगरकडे येणाऱ्या एसटी बसने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या इको गाडीने एसटी बसला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. 


सहा जणांचा मृत्यू...


तर, या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतांना मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.


रुग्णालयात मोठी गर्दी...


भाळवणी परिसरात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असून, यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आधी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखले केले. तसेच, अपघातात जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह देखील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, यानंतर नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. पोलिसांकडून मयत व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच, ओळख पटताच नातवाईकांना याची माहिती दिली जाणार आहे. पण अपघातात एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! वसईत लोकल ट्रेनच्या धडकेत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू