Ayodhya Ram Mandir Inauguration : देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोळाल्याचा उत्साह पाहायला मिळत असून, तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देखील अयोध्येत राम मंदिरात विराजमान झालेल्या रामाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यावर आपण देखील अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे यांनी आज आपल्या आरक्षण यात्रेदरम्यान अहमदनगरमधील भिंगार येथे श्रीराम मंदिरात दर्शन घेतले, यावेळी प्रभू श्रीरामाची आरती करत आरक्षण मिळाल्यावर आपण अयोध्येला जाणार असल्याच त्यांनी म्हटलंय. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सर्वत्र गजर होत असून, जरांगे यांनी आज यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आपली आरक्षण यात्रा जवळच्या श्रीराम मंदिराकडे वळवली. दरम्यान, आज मोठा उत्साहा असून अनेक वर्षाची राम मंदिराची प्रतीक्षा संपली, त्यामुळे आम्हालाही आनंद झाला आहे. यावेळी आपण रामाला साखर घालणार नसून, उद्या मात्र रामाला साकड घालून आरक्षण मिळाल्यावर आपण आयोध्याला जाणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. 


रामाचा वनवास मिटला, आता मराठ्यांचा वनवास मिटवा


मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनात वनवासाचे वस्त्र घालून आंदोलक सहभागी झालेत. मुंबईच्या दिशेने हजारो मराठा समाज निघाला आहे. आज श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुणांनी पोत्यांचे वस्त्र घालून वाटचाल सुरू केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. 'अयोध्येत राम मंदिर तयार झाले, रामाचा वनवास मिटला. आता मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊन आमचाही वनवास मिटवा. अन्यथा या सत्ताधाऱ्यांना वनवासात पाठवल्या शिवाय राहणार नाही अशी भावना मराठा आंदोलनकर्त्यांनी बोलावून दाखवली. 


मदरशात रात्र काढली... 


ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईकडे निघाले असून, मुंबईच्या आझाद मैदानात ते आमरण उपोषण करणार आहे. त्यांच्या मुंबई आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, आपल्या दुसऱ्या दिवसाचा मुक्काम जरांगे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बाराबाभळी येथील मदरशात केला. यावेळी त्यांची सभा देखील मदरसा मैदानात झाली. यावेळी मुस्लीम बांधवांकडून जरांगे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे जरांगे यांच्या याच दौऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदा मदरशावर भगवे झेंडे लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश यातून देण्यात आला. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


आरक्षण घेऊन आल्यास अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारतो: मनोज जरांगे