मुंबई: शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि सपा आमदार अबू आझमी यांनी केली आहे.


कायदे हातात घेणारा तो कोणीही खासदार असेल, त्याच्यावर सरकारने कारवाई करायलाच हवी, असं आमदार वारीस पठाण म्हणाले.

खासदार जर अशी गुंडागिरी करत असेल, तर ते सहन केलं जाऊ शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण करणं अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही वारीस पठाण यांनी केली.

अबू अाझमींची प्रतिक्रिया

शिवसेनेवाले कालही गुंड होते, आजही गुंड आहेत, लोकप्रतिनिधी होऊनही ते सुधारत नाहीत. त्यामुळे अशी मारहाण करणाऱ्या खासदाराचं निलंबन करायला हवं, तरच त्यांना धडा मिळेल, असं अबू आझमी म्हणाले.

काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली.

रवींद्र गायकवाड हे आज पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचं बिझनेस क्लासचं तिकीट होतं, मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं. यावरुन त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली.

बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं.

रवींद्र गायकवाड यांचं स्पष्टीकरण

बिझनेस क्लासचं तिकीट असताना इकॉनॉमी क्लासमध्ये का बसवलं, याची तक्रार करण्यासाठी तक्रार बूक मागितलं. मात्र एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने अरेरावी करत, अंगावर धावून आला. त्यामुळे मी शिवसेनेचा खासदार आहे, हे सांगून त्याला 25 वेळा सँडलने मारलं, असं शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं.

कोण आहेत रवींद्र गायकवाड?

  •  रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
    •    लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
    •    उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचीत आहेत
    •    रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
    •    दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
    •    तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.


संबंधित बातम्या

... म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड


शिवसेना खासदाराची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण