मुंबई: डॉक्टरांवरील हल्ले निषेधार्ह आहे. त्यांच्यावर हल्ला होणार नाही याची काळजी घेऊ. पण डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे सामान्य रुग्णांचेच हाल होतात. त्यामुळे डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, आम्ही डॉक्टरांच्या पाठिशी उभे आहोत, डॉक्टरांनी समाजाला शिक्षा देऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.


डॉक्टरांवरील हल्ले, मार्डचा संप याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिलं.

मुख्यमंत्री म्हणाले, "डॉक्टरांवरील हल्ले निषेधार्ह आहेत. डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना शासन व्हावं म्हणून विधी मंडळाने विशेष कायदे केले. डॉक्टरांच्या मागे सरकार उभे आहे".

नादान लोकांमुळे डॉक्टरांमध्ये असंतोष 

याशिवाय अनेकवेळा असे संप पुकारले जातात, मात्र यात  सर्वाधिक हाल गरीब रुग्णांचे होतात. सरकार डॉक्टरांना आश्वस्त करु इच्छिते की अशा घटना घडू नये याची काळजी घेऊ. काही नादान लोकांनी असं काम केल्यामुळे असंतोषाची भावना आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

रुग्णांना मरण्याकरिता सोडू नका 

डॉक्टरांनी अशा नादान लोकांची दखल घेतली तर इतर रुग्णांना सेवा नाकारणं, संपावर जाणं हे योग्य नाही. सभागृहाच्या माध्यमातून डॉक्टर, संघटनांना विनंती करतो, या प्रकरणी सरकार सातत्याने चर्चा करतेय. डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. काल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी चर्चा झाली, आरोग्य मंत्र्यांनी पण आश्वासन दिलं. असं असताना संपामुळे नागरिक, गरिबांचे हाल होत आहेत. ऑपरेशन रद्द करावे लागले, डॉक्टनां देवाचा दर्जा देतात. अशावेळी रुग्णांना मरण्याकरिता सोडून द्यायचं हे योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

कोणी नादान नालायक माणसांनी कारवाई केली म्हणून निरपराध रुग्णांना त्याची सजा भोगावी लागणं हे चुकीचं आहे. कारवाई करण्याची आमची तयारी आहे, चर्चेला बोलवलं आहे, मी सुद्धा चर्चा करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

डॉक्टरांना संरक्षण देऊ

डॉक्टरांना संरक्षण देण्याची सरकारची तयारी आहे. समाजत चीड निर्माण होत आहे. रुग्ण सेवेपासून वंचित ठेवले जातं आहेत.  संघटनांनी याची दखल घेतली पाहिजे, डॉक्टरांनी समाजाला शिक्षा देऊ नये, असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे

मार्डचे डॉक्टर चौथ्या दिवशीही सामूहिक रजेवर

‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे’, गिरीश महाजन यांचा दावा

आज रात्री 8 पर्यंत रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू : सरकार 

नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित

हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर

मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट