नाशिक: नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात डाळिंबाच्या शेतीनं बऱ्याच शेतकऱ्यांचं आयुष्य पालटलं. अंकुश जाधव हे त्यातीलच एक. पण ज्यावेळी डाळिंबात मोठा तोटा झाला त्यावेळी त्यांना वाचवलं, शेवग्याने. फक्त वाचवलंच नाही तर कोट्यधीशही बनवलं.

३० एकरातील शेवग्यातून ते दीड कोटींचं उत्पन्न मिळवत आहेत.  या कोट्यधीश शेतकऱ्याचा हा प्रवास.

अंकूश जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती होती. त्यात डाळिंबाची लागवड करत त्यांना ८२ एकरापर्यंत शेतीचा विस्तार केला. मात्र २०१४ साली डाळिंबावर रोग पडला आणि संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. तेव्हा पर्याय म्हणून आपल्या मुलांच्या मदतीनं त्यांनी ३ एकरात ओडीसी जातीच्या शेवग्याची लागवड केली.

सुरुवातीला ३ एकर, मग १५ एकर आणि आता ३० एकरावर त्यांनी शेवग्याची लागवड केली आहे. शिवाजी, अमोल आणि प्रशांत ही त्यांची तीन मुलं आता शेतीचं व्यवस्थापन बघतात. सध्या ८२ पैकी ६० एकर शेती लागवडीखाली आहे. यात ३० एकरात शेवगा, १० एकरात कांदा, ४ एकरात अॅपल बोर, ५ एकरात चारा पिकं आणि उर्वरीत क्षेत्रात हंगामी पिकं घेतात. या सगळ्या पिकांचं व्यवस्थापन हळूहळू सेंद्रीय पद्धतीनं करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

भरघोस उत्पन्न, चांगला दर

३० एकरातील शेवग्याच्या लागवडीसाठी २५ लाखांचा खर्च आला. यंदा यातून अंकूश जाधव यांना आतापर्यंत १०० टनांहून जास्त उत्पादन मिळालंय. दर्जा चांगला असल्यानं व्यापारी जागेवर खरेदी करतात. आतापर्यंत त्यांना सरासरी ७० रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. यातून ७० ते ७५ लाख रुपये मिळालेत. आणखी १५० ते २०० टन उत्पादनाची आशा आहे.

सरासरी किमान ४० रुपयांचा दर जरी धरला, तरी ८० लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. असं एकूण दीड कोटींचं उत्पन्न मिळण्याची आशा अंकुश जाधव यांना आहे. यातून खर्च वजा जाता सव्वा कोटींचा नफा त्यांना मिळणार आहे.

डाळिंबानी संपन्न केलेल्या शेताला शेवग्याने फक्त तारलं नाही, तर आणखी समृद्ध केलं. अंकुश जाधव यांनी पर्याय म्हणून लागवड केलेला शेवगा कोटींच्या घरात नफा देणारा ठरला.

VIDEO: