Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. नुकतेच या मालिकेचे 200 भाग पूर्ण झाले आहेत. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
माऊली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सगळं प्रेक्षकांना आवडलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. माऊली, त्यांची भावंडं, इतकंच नव्हे तर मालिकेत माऊलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा हे पात्रंही लोकप्रिय झालं आणि मालिकेत हे पात्रं प्रेक्षकांना पुन्हा भेटायला येणार आहे. मालिकेत आता पसायदानाला सुरुवात झालेली आहे.
माऊलींच्या आवाजात ते ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ही मालिका गेले अनेक महिने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करते आहे. माऊलींचे चमत्कार, त्यांनी केलेलं गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळाली. मालिकेत दाखवली गेलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेनी स्थान निर्माण केलं. 200 भागांचा टप्पा मालिकेने ओलांडला असून यापुढेही मालिकेत अनेक गोष्टी, नवनवीन पात्रं बघायला मिळणार आहेत.
संबंधित बातम्या