Sarsenapati Hambirrao Review : सरसेनापती हंबीरराव... सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा सिनेमा. छत्रपतींच्या स्वराज्याला जपण्यासाठी छातीचा कोट करुन लढणारा पराक्रमी शिलेदार. त्यांची गोष्ट तेवढ्याच ताकदीनं आजच्या पिढीपर्यंत पोहचवल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा सिनेमाच्या निर्मात्यांचं आणि टीमचं मनापासून कौतुक करायला हवं.


ऐतिहासिक सिनेमा करणं हे नेहमीच आव्हानात्मक काम असतं, पण प्रवीणचा हा पहिलाच प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरलाय असं म्हणायला हवं. कारण जी गोष्ट, जो इतिहास तो आपल्यासमोर मांडू पाहतोय तो आपल्या आतपर्यंत पोहोचतो, कधी उर अभिमानाने भरुन येतो तर कधी डोळ्यात पाणी उभं करतो आणि तिथंच दिग्दर्शक म्हणून प्रवीण आणि सिनेमा म्हणून ‘सरसेनापती हंबीरराव’ दोघेही जिंकतात.


जेव्हा आपण छत्रपतींच्या इतिहासाबद्दल बोलतो, वाचतो, ऐकतो, पाहतो तेव्हा राज्याभिषेक हा सर्वोच्च बिंदू असतो. त्याच्या पुढचं जाणून घेणं आपण टाळतो आणि मग थेट शंभूराजेंच्या कारकीर्दीवर येतो. कारण राज्याभिषेकानंतरचं शिवरायांचं निधन आणि दुहीचं राजकारण या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप अस्वस्थ करतात.


पण हा जो मधला काही वर्षांचा कालखंड होता तो स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. जिथं हंबीरराव मोहितेंचं कर्तृत्व अधोरेखित होतं. अंतर्गत राजकारण उखडून काढत परकीय शक्तींना उलथवून टाकण्यात हंबीररावांचा मोठा वाटा होता.


हीच गोष्ट प्रवीण तरडेनं मोठ्या पडद्यावर मांडलीय. सिनेमा सुरु होतो तो प्रतापराव गुजर अवघ्या सहा जणांना घेऊन खानाच्या छावणीत घुसतात तिथून. हा सीन कमाल शूट केलाय. कसलीही लढाई, कसलाही नरसंहार न दाखवता फक्त दोन शॉट्स आपल्या डोळ्यात पाणी आणतात. यासाठी प्रवीणच्या कल्पनेला आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या महेश लिमयेला पैकीच्या पैकी मार्क्स. असे आणखीही बरेच प्रसंग आहेत जिथं आपसुकच ‘क्या बात है’ असं म्हणावं वाटतं.


छत्रपती शिवाजी महाजांच्या मृत्यूचा प्रसंगही तसाच. ‘शिवराय नावाचं तेज ब्रम्हांडात विलीन झालं’ हे आजवर वाचलेलं, ऐकलेलं वाक्य पडद्यावर अक्षरश: जिवंत केलय.


जेव्हा शंभूराजे आणि हंबीरराव फोंड्याच्या लढाईसाठी निघतात तेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावरुन दोघांनीही भरधाव फेकलेला घोडा, त्यांचा आवेश, त्यांचा त्वेष जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलंही रक्त उसळल्याशिवाय राहत नाही.


थोडक्यात प्रवीणच्या लिखाणाला आणि दिग्दर्शनाला महेश लिमयेच्या कॅमेऱ्याने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलय.


एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण म्हणाला होता की साऊथचा सिनेमा माझा आदर्श आहे. आणि ते हा सिनेमा पाहाताना जाणवतं.


स्वराज्याचा सरसेनापती कसा असावा हे सांगत, त्याचे गुणविशेष अधोरेखित करत जेव्हा हंबीरराव पहिल्यांदा पडद्यावर अवतरतात त्या सीनवर तर थेट राजामौळींचा प्रभाव दिसतो.


या सिनेमात अशा खूप गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही सिनेमा आवर्जून पाहायलाच हवा. पण त्याचबरोबर काही गोष्टी आहेत त्या  टाळता येऊ शकल्या असत्या.


त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे सततचे टाळ्यांसाठीचे संवाद. प्रवीणकडे लोकप्रिय संवादांची खाण आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमात ते दिसतं पण ती शब्दसंपदा जपून वापरण्याची गरज आहे. प्रत्येक संवादात यमक जुळवण्याचा मोह टाळायला हवा होता. त्यामुळं होतं काय की कधी कधी ते संवाद गोष्टीवर वरचढ होतात. आउलट मोजक्याच आणि महत्वाच्या प्रसंगात तशा प्रकारची शब्दरचना केली असती तर त्याची मजा, त्याचं महत्व आणखी अधोरेखित झालं असतं.


हा एक मुद्दा आणि दुसरा म्हणजे गश्मीरने साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या आणि शंभूराजांच्या भूमिका. गश्मीरने काम उत्तम केलय यात अजिबात शंका नाही. मात्र तरीही छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावर सतत रागाची रेषा न दाखवता काहीसे संयत आणि प्रसन्न दाखवले असते तर संभाजी राजांचं अॅग्रेशन, त्यांचं रौद्ररुप ठळकपणे दिसलं असतं. यातून शिवाजी राजे आणि शंभूराजे या दोन्ही व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे उभ्या राहू शकल्या असत्या.


गश्मीरबरोबरच बाकीच्या कलाकारांची कामंही तेवढीच प्रभावी झाली आहेत. स्वत: प्रवीण तरडे, मोहन जोशी, उपेंद्र लिमये, राकेश बापट, स्नेहल तरडे, श्रुती मराठे, सुनील अभ्यंकर, किरण यज्ञोपवीत, देवेंद्र गायकवाड आणि रमेश परदेशी अशा साऱ्याच मंडळींनी या सिनेमाला संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.


या सिनेमातली आणखी आवडलेली विशेष गोष्ट म्हणजे…वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रुपात भेटणाऱ्या ताराराणी… आपल्या लेकीवर शस्त्रसंस्कार घडवणारा हंबीरारावांनमधला बाप अनेकदा मनाला भिडतो. आणि याच सिनेमाच्या निमित्ताने प्रवीणने आपल्या पुढच्या ऐतिहासिक पटाची बीजं पेरलीत असं म्हटलं तर चुकीचं ठरु नये.


मदन मानेच्या कलादिग्दर्शनाबद्दल आवर्जून सांगायला हवं. औरंगजेब जेव्हा स्वराज्याच्या सीमेवर असतो तेव्हा त्याच्या दरबारात अगदी सहज दिसणाऱ्या मराठी खुणा कलादिग्दर्शकाचा अभ्यास दाखवतात.


थोडक्यात शिवरायांच्या इतिहासातली त्यांच्या सरसेनापतींची गाथा सांगणारा हा सिनेमा तुम्ही आवर्जून पाहायला हवा आणि तो मोठ्या पडद्यावरच पाहायला हवा.