वॉटर कप स्पर्धेने आणले शिवारात पाणी
आमीर खान आणि सत्यजित भटकळ यांनी पुढाकार घेऊन दुष्काळाशी दोन हात करण्याच्या उद्देशाने पाणी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.
या मार्फत 20 एप्रिलपासून सुमारे ११९ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा सुरु करण्यात आली होती. या स्पर्धेअंतर्गत बीडमधील अंबाजोगाई, साताऱ्यातील कोरेगाव, आणि अमरावतीतील वरुड गावातील ग्रामस्थांना एकत्रित करून 'जलमित्र सेना' स्थापन केली. या सेनेला पाणी फाऊंडेशनने जलसंधारणासंदर्भात प्रशिक्षण दिले.
आमीर खान आणि त्याच्या टीमने वरुड येथील वाठोडा येथे स्वत: श्रमदान केले होते. सध्या हा परिसरही जलमय झाला आहे.
दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यावर वरुण राजाने सध्या चांगलीच कृपा केली आहे. मराठवाड्यात सध्या सर्वत्र तुफान पाऊस बरसतो आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरी, तलाव सर्वच जलमय झाले आहेत. आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेतील अंबाजोगाईमधील पाटोदा येथील विहिरी जलमय होत आहेत.
महाराष्ट्रात हजारो हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी निर्माण करण्याचा संकल्प केला होता. पाणी फाऊंडेशनच्या या संकल्पाला मूर्त स्वरूप येताना पाहायला मिळत आहे.