Pandharpur Ashadhi Wari 2023:  आषाढ महिना सुरू झाला असून वारकऱ्यांना आता एकादशीचे वेध लागले आहेत. एकादशीच्या निमित्ताने आता विविध पारंपरीक पूजा विधी सुरू झाल्या आहेत. आषाढी  यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे .
  

   

आज सकाळी अकरा वाजता  विठ्ठल रुक्मिणीचा पलंग  काढण्यात येणार असून आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर मध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे.

आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा तक्क्या लावण्यात येणार आहे. चोवीस तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे.  इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे चार वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते आणि त्यानंतर  मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याच साठी दर्शन बंद राहणार आहेत. उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे. आता आषाढी यात्राकाळात आजपासून  मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे.  यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे 


संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पहिलं रिंगण 


संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज लोणंदहून तरडगाव मुक्कामी जाणार आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार आहे. संत तुकाराम यांची पालखी आज सणसर येथून आंथुर्णे मुक्कामी जाणार आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात दुसरं रिंगण गोल रिंगण आज बेलवंडी येथे होणार आहे. संत तुकाराम यांच्या पालखीतील मेंढरांचे रिंगण सोमवारी काटेवाडी येथे पार पडले.