मुंबई : डास सगळीकडे आढळतात, घरात, घराबाहेर, अगदी सगळीकडे आणि डास नुसते असतात असे नाही तर अनेक वेगवेगळे आजार देखील पसरवतात. डेंग्यू, मलेरिया, अरबोव्हायरस, इंसेफॅलिटिस, चिकनगुनिया, झिका ताप ही डासांमुळे पसरणाऱ्या आजारांची यादी बरीच लांबलचक आहे.  डासांच्या तब्बल 3500 पेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यांच्यापैकी काही तर जीवघेण्या ठरू शकतील इतक्या भयंकर आहेत.  काही प्रकारचे डास पक्षी, उभयचर प्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रक्तावर जगतात तर काही डास माणसांना चावतात. अनोफेलेस डासाच्या एका चाव्यामुळे मलेरिया होऊ शकतो तर एडिस डास डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका विषाणू पसरण्यासाठी कारणीभूत ठरतो.  लक्षणीय बाब अशी की डासाची फक्त मादीच माणसांना चावते कारण अंडी निर्माण करण्यासाठी त्यांना आपल्या रक्तातील प्रथिनांची आवश्यकता असते.


डॉ. मुकेश संकलेचा, कन्सल्टन्ट पेडियाट्रिशियन, बॉम्बे हॉस्पिटल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक डेटा डॅशबोर्ड हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमच्या अहवालानुसार भारतात एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत मलेरियाचे 3.37 लाखांपेक्षा जास्त तर डेंग्यूचे 1.30 लाख रुग्ण नोंदवले गेले. या सर्व डासजन्य आजारांमुळे होणारे वैद्यकीय खर्च, उत्पादनाचे, कमाईचे होणारे नुकसान यामुळे उद्भवणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्च लक्षात घेता हे आजार म्हणजे देशावरचे खूप मोठे आर्थिक ओझे असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते.  जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार मलेरिया आणि डेंग्यूमुळे उद्भवलेले वार्षिक आर्थिक खर्च अनुक्रमे 11640 कोटी रुपये आणि 6000 कोटी रुपये होते.  आपण या मुद्द्यांची दखल घेतली आहे आणि चांगली बाब अशी की, एक देश या नात्याने आपण उद्धिष्ट ठरवले आहे की वर्ष 2030 पर्यंत आपण मलेरिया-मुक्त देश बनायचे आहे. सरकार आपल्या स्तरावर प्रयत्नशील आहेच, पण त्याचवेळी प्रत्येक कुटुंबाने देखील आपल्या सर्व सदस्यांना डासांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.


पावसाळा असल्यामुळे अनेक जागी पाणी साठून राहते व संसर्गाचा धोका वाढतो.  आपले घर आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ व सुरक्षित राहील, डासांची पैदास होऊ शकेल अशी एकही जागा आपल्या जवळपास असणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे.  मलेरियाचे डास घाणेरड्या साठलेल्या पाण्यात वाढतात तर डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात वाढतात. आपल्या घरातील पाईप्स, पाण्याच्या टाक्या व पाणी साठून राहते अशा सर्व जागांची नियमितपणे तपासणी करा, त्या सर्व जागा कायम स्वच्छ ठेवा. अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे वापरण्यासारख्या काही अगदी साध्या उपायांचे पालन करून देखील आपण संसर्गाचा धोका कमी करण्यात मदत करू शकतो.


एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवा की डास हे फक्त संध्याकाळीच नव्हे तर संपूर्ण दिवसभर सक्रिय असतात.  मलेरिया पसरवणारे डास तिन्हीसांजा झाल्यापासून पहाटेपर्यंत सक्रिय असतात तर डेंग्यूचा डास दिवसभरात चावतो.  घरात असताना डासांपासून सतत संरक्षण मिळत राहावे यासाठी मॉस्किटो रिपेलंट्सचा वापर करता येऊ शकतो.  भारतातील सर्वात शक्तिशाली लिक्विड व्हेपोरायझर आधुनिक पर्याय देखील उपलब्ध आहेत.  घराबाहेर पडताना व्यक्तिगत रिपेलंट्स सहज वापरता येतात कारण त्यांचे देखील विविध पर्याय उपलब्ध आहेत, जसे, रिपेलंट स्क्रीन क्रीम्स, रोल-ऑन्स इत्यादी आणि या पर्यायांचा प्रभाव दीर्घकाळपर्यंत टिकून राहतो. लहान मुलांची त्वचा नाजूक व संवेदनशील असते त्यामुळे त्यांच्यासाठी बालरोगतज्ञांनी प्रमाणित केलेलीच उत्पादने वापरावी. सुगंधांचेही भरपूर पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, त्यातून आपण आपली आवड निवडू शकतो. 


डासाच्या एका चाव्याने देखील डेंग्यू किंवा मलेरिया होऊ शकतो.  स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डासांना त्वरित मारून टाकणे हा आहे. हिट स्प्रेसारखे विश्वसनीय पर्याय आपल्याकडे आहेत ज्यांच्या मदतीने डासांना तातडीने नष्ट केले जाऊ शकते.  डास डोळ्यांना सहजासहजी दिसून येतातच असे नाही पण ते असतात, त्यामुळे बेड, सोफा यांच्या खाली, पडद्यांच्या, कपाटांच्या मागे स्प्रे नक्की मारावा कारण याच डासांच्या लपून राहण्याच्या हमखास जागा असतात.  शहरांच्या बाहेर जिथे विजेची समस्या असते, अशा ठिकाणी स्प्रे, मॉस्किटो नेट्स आणि पटकन जळणारी कार्ड्स यांचा वापर करून आपण स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो.  खिडक्या, दरवाजे आणि पलंगांना जाळ्या लावल्या जाऊ शकतात. 


सध्याच्या कोविड-१९ महामारीमुळे संपूर्ण जगभरातील आरोग्य व्यवस्थांवर प्रचंड मोठे अतिरिक्त ओझे निर्माण केले आहे.  आरोग्य यंत्रणा पुरेशी मजबूत नसलेल्या भारतासारख्या देशांना सार्वजनिक आरोग्याला आधीपासून भेडसावत असलेले धोके आणि कोविड-१९ सारखे नवे धोके असे दुहेरी आव्हान झेलावे लागत आहे.  आरोग्याचा विचार करता, कोविड-19 ची लक्षणे आणि डासजन्य आजारांची लक्षणे काही प्रमाणात समान असल्याने दोन्हींमध्ये नेमका फरक काय ते नीट समजून घेणे आवश्यक बनले आहे.  ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसत असल्यास लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधावा व तपासणी करून घ्यावी.  काही डास जीवघेणे देखील ठरू शकतात त्यामुळे हलगर्जीपणा करणे अजिबात योग्य नाही.