Health: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. सध्या आपल्याला लोकांमध्ये एक नवा बदल पाहायला मिळत आहे, तो म्हणजे या जगात तसं पाहायला गेलं तर, मांसाहार करणाऱ्यांची कमी नाही, पण आजकाल शाकाहार स्वीकारणाऱ्यांची संख्याही तितकीच झपाट्याने वाढत आहे. अनेक लोक मांसाहार सोडून शाकाहारी बनत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही शाकाहारी असाल तर याचे जितके फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटेही आहेत. जाणून घ्या...


 


मांसाहार सोडून शाकाहारकडे वळताय? 


दरवर्षी 1 ऑक्टोबर हा जागतिक शाकाहारी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1977 मध्ये झाली. जागतिक शाकाहार दिन साजरा करण्यामागचा उद्देश शाकाहारी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा आहे. हा दिवस सजीवांप्रती दयाळूपणाशी संबंधित आहे. मांसाहार सोडून शाकाहार स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने लोक सजीव प्राण्यांपासून बनवलेले कोणतेही अन्न खात नाहीत. नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीने सुरू केलेल्या जागतिक शाकाहार दिनाचा उद्देश नैतिक मानवी मूल्ये समजावून सांगणे, पर्यावरण आणि आरोग्याविषयी जागरुकता आणणे, तसेच अधिकाधिक शाकाहार अंगीकारण्यावर भर देणे हा आहे. तूर्तास आपण जाणून घेऊया की शाकाहारी असण्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे होऊ शकतात.


 


हृदय निरोगी राहते


शाकाहारी लोक मांसाहारी लोकांपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट खातात, त्यामुळे त्यांच्यात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता कमी असते आणि हृदय निरोगी राहते. शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.


 


वजन कमी करण्यास मदत होते


शाकाहारी पदार्थांमध्ये जास्त चरबी नसते, त्यामुळे वजन राखण्यासाठी ते फायदेशीर ठरते. तर मांसाहार प्रेमींना वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.


 


पचनक्रियाही निरोगी राहते


शाकाहारी अन्न पचायला सोपे असते आणि त्यामध्ये फायबरही चांगल्या प्रमाणात आढळते, त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते आणि अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठतेची शक्यता कमी असते.


 


'या' गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात


शाकाहारी पदार्थांचे अनेक फायदे आहेत, पण जर तुम्ही आहाराचा समतोल साधला तरच. आजकाल खाण्याच्या सवयी खूप बिघडल्या आहेत. अगदी शाकाहारी लोकांसाठीही तेलकट पदार्थ आणि जंक फूडचे भरपूर पर्याय आहेत.


 


शाकाहार खाण्याचे हे तोटे माहित आहेत?


जर शाकाहारी लोकांनी योग्य आहार घेतला नाही, तर त्यांना प्रथिने, व्हिटॅमिन बी 12, ओमेगा 3, कॅल्शियम इत्यादी पोषक तत्वांची कमतरता भासू शकते, ज्यामुळे कधीकधी आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे जर तुम्ही शाकाहारी असाल तर चांगल्या आहाराकडे लक्ष द्या. जसे की, आपल्या आहारात हिरव्या भाज्या, हंगामी फळे, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, विविध प्रकारचे धान्य, सुका मेवा, नट, बिया इत्यादींचा समावेश करा.


 


हेही वाचा>>>


Health: 'ऑनलाइन फूड ऑर्डर केलंय? सावधान..' कंटेनर्समधून कॅन्सरचा धोका? संशोधनातून माहिती समोर, नेमकं सत्य काय?


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )