Health: एखादी महत्त्वाची परीक्षा, ऑफिसमधील मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा एखादी चिंता असताना अनेकांना पोटात विचित्र वाटते किंवा “पोटात फुलपाखरे उडत आहेत” असे जाणवते. याचे कारण म्हणजे मेंदू आणि पोट यांच्यात सतत संदेशांची देवाणघेवाण होत असते. तणाव वाढला की या संदेशांमध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम पचनावर होतो. तणावामुळे थेट पचनाचा आजार होत नाही. मात्र, आधीपासून असलेल्या पोटाच्या समस्या तणावामुळे वाढू शकतात. तणावाच्या वेळी शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन हे हार्मोन्स वाढतात. यामुळे पचनाची प्रक्रिया बदलू शकते आणि पोटात जास्त आम्ल तयार होऊ शकते. याबाबत पुणे येथील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, डॉ. विशाल सेठ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, जाणून घेऊया...

Continues below advertisement

तणाव आणि चिंता यांचा परिणाम पोटावर कसा होतो?

डॉ. विशाल सेठ सांगतात, आपला मेंदू आणि पचनसंस्था एकमेकांशी जोडलेले आहेत. तणाव आणि चिंता यांचा परिणाम पोटावरही होऊ शकतो. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, जुलाब किंवा पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे तणावाचा पचनसंस्थेवर होणारा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. जास्त तणावामुळे काही लोकांना अॅसिडिटी, छातीत जळजळ, गॅस, पोट फुगणे, पोटदुखी, मळमळ, बद्धकोष्ठता किंवा जुलाब होऊ शकतात. तणाव जास्त काळ राहिल्यास IBS, अॅसिड रिफ्लक्स आणि इतर पोटाच्या समस्या वाढू शकतात. तणावाचा परिणाम आपल्या आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंवरही होऊ शकतो. हे चांगले जिवाणू पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यांचे संतुलन बिघडल्यास पचनाच्या समस्या होऊ शकतात.

तणावामुळे होणाऱ्या पोटाच्या समस्या कशा कमी कराल?

डॉ. विशाल सांगतात, पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा. पौष्टिक आहार घ्या. आहारात फळे, भाज्या, पालेभाज्या, संपूर्ण धान्य, फायबरयुक्त पदार्थ आणि दही यांचा समावेश करा. भरपूर पाणी प्या. खूप मसालेदार, तळलेले आणि पॅकेज्ड पदार्थ कमी खा. चहा-कॉफी कमी घ्या आणि अल्कोहोल टाळा. धूम्रपान करू नका. दररोज काही वेळ योग, ध्यान आणि दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या आणि काम व वैयक्तिक आयुष्यात योग्य समतोल ठेवा. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे आणि मन शांत ठेवणेही फायदेशीर ठरू शकते.

Continues below advertisement

तर डॉक्टरांचा सल्ला घ्या....

जर तुम्हाला सतत पोटदुखी, खूप अॅसिडिटी, वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठता, शौचात रक्त, अचानक वजन कमी होणे किंवा अन्न गिळताना त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या..