Health Tips : वृद्धत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येणारी एक सामान्य प्रक्रिया आहे. वयानुसार येणारं वृद्धत्व हे वेगळं पण अनेकांना वयाच्या आधीच वृद्धत्वाचा सामना करावा लागतोय. याचं कारण म्हणजे आपला चुकीचा आहार, चुकीच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली. अनेकदा अकाली वृद्धत्व आलेले लोक हे आपल्या आजूबाजूला दिसतात. अकाली वृद्धत्वासाठी कारणीभूत असणारे एक कारण म्हणजे साखरेचं अतिसेवन. जे लोक जास्त प्रमाणात साखर किंवा गोड पदार्थांचे सेवन करतात, त्यांना अकाली वृद्धत्वाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. एवढेच नाही तर शरीरातील अनेक अवयवांच्या कार्यावरही साखरेचा परिणाम होतो.


साखर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशी अनेक संशोधनेही समोर आली आहेत, ज्यामध्ये साखरेचे अतिसेवन अनेक गंभीर आजारांशी निगडीत आहे. खूप गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम कसे होतात आणि कोणत्या अवयवांवर त्याचा परिणाम होतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


1. हृदयाच्या आरोग्यावर परिणाम 


जास्त साखरेचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे पाहिल्यास, साखरयुक्त पेय प्यायल्याने रक्तदाबावर विपरीत परिणाम होतो. यकृत शरीरातील अतिरिक्त साखरेचे फॅटमध्ये रूपांतर करू लागते. या कारणांमुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.   


2. मेंदूच्या आरोग्यावर परिणाम 


मेंदू आपले काम करण्यासाठी शरीरातील ग्लुकोज घेतो. तसेच, साखरेची पातळी जास्त असल्याने, न्यूरॉन्स आणि चेतापेशींमधील संवाद तुटू शकतो. कारण न्यूरोट्रांसमीटर आणि रासायनिक संदेशवाहक योग्य प्रमाणात तयार होत नाहीत. जास्त साखरेचे सेवन केल्याने मेंदूच्या आकलनशक्तीवर परिणाम होतो आणि स्मरणशक्तीवरही वाईट परिणाम होतो. 


3. त्वचेवर वाईट परिणाम


खूप गोड पदार्थ खाल्ल्याने कोलेजन एकमेकांशी जोडले जाते, ज्यामुळे त्वचा घट्ट होते. जास्त साखर खाल्ल्याने त्वचेच्या समस्या जसे मुरुम, सुरकुत्या, काळे डाग होण्याची शक्यता वाढते. 


4. डीएनए 


अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त साखरेचे सेवन केल्याने डीएनए खराब होऊ शकते आणि अकाली वृद्धत्व होऊ शकते. याशिवाय हृदयविकार, मधुमेह, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो. 


5. लठ्ठपणा 


जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे लठ्ठपणा देखील होऊ शकतो. जर तुम्ही जास्त कॅलरीज खाल्ल्यानंतर कॅलरीज बर्न करण्यासाठी काहीही करत नसाल तर तुमचे वजन पुन्हा वेगाने वाढू लागेल आणि जर तुम्ही वेळीच त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्ही लठ्ठपणाचे बळी देखील होऊ शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Weight Loss: 'हे' चार पदार्थ नाश्त्यामधून खाल्ल्याने अतिरिक्त चरबी वितळेल, वजन कमी होऊन दिसाल स्लिम आणि फिट