Health: आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत ॲसिडिटी होण्याच प्रमाण खूप वाढल्याचं दिसतं. थोडा चहा किंवा कॉफी जास्त झाली की डोकं दुखू लागतं, बाहेरचं काही खाल्लं की छातीत जळजळ, तोंड आंबट पडणे यासह अनेकांना मळमळ, कासावीस होणे, ढेकरा येणं अशा कितीतरी ॲसिडिटीमुळे होणाऱ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेकजण यावर आराम मिळावा म्हणून अनेक प्रकारची औषधं घेतात. काही जण दूर्लक्षही करतात. पण ही समस्या कालांतराने  वाढत जाऊन त्रास आणखी वाढतो. यासाठी काही घरगुती पदार्थांनी आराम मिळू शकतो. 


अनेकजण ॲसिडिटीवर आराम मिळावा यासाठी पेनकिलर, इनो, सोडा अशा अनेक बाहेरच्या गोष्टी ट्राय करायला जातात. तात्पुरतं बरं वाटतं पण काही वेळाने पुन्हा त्रास व्हायला लागतो. यासाठी काही फळं आणि घरगुती काढा प्यायल्याने आराम मिळू शकतो. 


नैसर्गिकपणे ॲसिडिटीवर केळी खाऊन करा मात


केळी फळात अनेक नैसर्गिक अँटासिड असतात, जे पोटातील ॲसिडिटीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. तसेच फायबर आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असल्याने केळी खाल्याने पोटात थंडावा राहतो. सारखी भूक लागत नाही. आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. केळीचं नियमीत सेवन केल्यानं पचनक्रीया सुधारते आणि ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. जर ॲसिडिटी झाल्यासारखे वाटू लागले तर एक केळी खाल्याने अॅसिडीटी बॅलेन्स होऊन पित्ताचा त्रास कमी होतो.


आल्याचा काढ्याने जळजळ होते कमी


आलं हे अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेले असते. यात अनेक अँटीऑक्सिडंट तसेच अँन्टी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहेत. आल्याचा रस पाण्यात थोडा उकळून सकाळी पिल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. आपल्या चहातही ॲसिडिटी बॅलेन्स करण्यासाठीच आलं टाकलेलं असतं. आल्याचा एक तुकडा पाण्यात काही वेळ उकळून त्यात थोडी साखर आणि दालचिनीचा बारीक तुकडा टाकून एक कप पाण्याचे अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळून हा काढा पिल्याने पित्तानंतर होणारी छातीतील जळजळ कमी होऊन लगेच आराम पडतो. आल्याने पोटातील गॅस्ट्रीक सेक्रेशन कमी होते. आणि जळजळ कमी होते.


नारळपाण्याने पोटात थंडावा


ॲसिडिटी झाली असेल तर नारळपाणी हा त्यावर हा रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं. नारळपाण्यात इलेक्ट्रोलाईट असल्यानं ते शरीरातील ॲसिडिटीचं संतुलन राखण्यास मदत करतात. म्हणूनच शारिरीक हलचाली केल्यावर किंवा व्यायामानंतर अनेक जण नारळपाणी आवर्जून पितात. शिवाय नारळपाण्यानं शरिरात थंडावा मिळतो आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो.  छातीत होणारी जळजळही यामुळे कमी होण्यास मदत होते. तसेच पचनक्रीया नीट होण्यात मदत मिळते.


दही पित्तनाशक


सकाळच्या वेळेत दह्याचं सेवन हे पित्तशमनाचंच एक जूनं तंत्र आहे. कोणत्याही महत्वाच्या कामाला बाहेर जाताना हातावर दही ठेवलं जायचं. शरिरात थंडावा देण्याचा स्वभाव असल्याने दह्याचे सेवन केलं जातं. अन्न पचनासाठी दह्याचं सेवन महत्वाचं मानलं जातं. दह्यामध्ये असणाऱ्या लॅक्टीक ॲसिडमुळे पोटात थंडावा निर्माण होऊन छातीत पित्त झाल्यानंतर होणारी जळजळ कमी होऊन आराम पडतो.