केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये या 10 गोष्टींवर असेल लक्ष
खडसे प्रकरणामुळे जे नुकसान झालं आहे, ते भरून काढण्यासाठी खान्देशाचा विचार करणार का? तसं झाल्यास कुणाची लॉटरी लागणार? ए.टी. नाना पाटील की हरिश्चंद्र चव्हाण?
वाचाळ आणि वादग्रस्त मंत्री जसे की साध्वी निरंजन ज्योती, गिरिराज सिंह, निहालचंद यांच्यावर कारवाई होणार का?
रस्ते व विमान वाहतूक असं सर्व ट्रान्सपोर्ट खातं (रेल्वे वगळून) एकत्र करण्याची शिफारस आहे. तसं झाल्यास विमान वाहतूक देखील नितीन गडकरींवरच सोपवलं जाणार का?
आपली खाती उत्तमपणे सांभाळणाऱ्या पीयुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी यांचं प्रमोशन होणार का?
मंत्रिमंडळ बनवताना 2014 मध्ये वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना स्थान दिलं गेलं नव्हतं. यावेळीही हा नियम लागू होणार का? नजमा हेप्तुल्ला आणि भाजपचा यूपीतला ब्राम्हण चेहरा असलेले कलराज मिश्र या दोघांची पंचाहत्तरी पूर्ण झाली आहे.
केंद्रात आणि महाराष्ट्रातही सरकारवर सातत्यानं तिखट टीका करणाऱ्या शिवसेनेला आणखी मंत्रिपद मिळणार का? टीकेची धार बोथट होईल याची पर्वा न करता शिवसेना ती स्वीकारणार का?
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला फेरबदल आहे, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बदल होणार का?
पक्षसंघटनेच्या कामासाठी काही मंत्र्यांचा भार मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातल्या फेरबदलांपाठोपाठ अमित शहा यांची नवी टीम कशी असणार, याचीही उत्सुकता आहे.
भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं मंत्रिपद रिक्त आहे. त्यांच्या जागी वर्णी लावताना मराठा चेहऱ्यालाच संधी मिळणार का?
मंत्रिपदाकडे गेली अनेक वर्षे डोळे लावून बसलेल्या रामदास आठवलेंना यावेळी तरी मंत्रिपद मिळणार का?