B-Day Special : भाजपच्या भीष्माचार्यांचं 90 व्या वर्षात पदार्पण
भारतीय जनता पक्षाचा इतिहास लालकृष्ण अडवाणींच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होण्यासारखा नाही. जनसंघ ते भाजपच्या प्रवासात त्यांनी अनेक स्थित्यंतरं पाहिली. जनता पार्टीचं सरकार बरखास्त झाल्यानंतर, स्थापन झालेल्या भाजपला एका वेगळ्या उंचीपर्यंत पोहचवण्याचं काम लालकृष्ण अडवाणी यांनी केलं. सध्या मोदी युगामुळे अडवाणी युग झाकोळलं गेलं असलं, तरी त्यांना भाजपचे भीष्माचार्य म्हणून आजही ओळखलं जातं. आज भाजपच्या या भीष्माचार्यांचा 90 वा वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराम मंदिर आंदोलनामुळे देशात सर्वात लोकप्रिय झालेल्या अडवाणींवर संघ परिवाराचाही वरदहस्त होता. तिसऱ्या अघाडीच्या सरकारमधील दुफळीमुळे 1998 मध्ये वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेत आलं. यावेळी अडवाणींनी पंतप्रधान पदासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा केली. वास्तविक, त्यावेळी अडवाणींना पंतप्रधान होण्याची संधी होती. पण त्यांनी स्वत: हून वाजपेयींच्या नावाची घोषणा केल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
इंदिरा गांधींनी 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू केल्याने, जनसंघ आणि इतर विरोधकांनी एकत्रित येऊन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीची स्थापना केली. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचा सूपडा साफ करुन जनता पार्टीने निर्विवाद बहुमत मिळवलं, आणि केंद्रात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकारची स्थापना झाली. या सरकारमध्ये लालकृष्ण आडवाणी माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री होते.
नवी जबाबदारी मिळाल्यानंतर, सर्वातआधी त्यांनी जनसंघाचे वरिष्ठ नेते आणि संस्थापक सदस्य बलराज मधोक यांना पक्षविरोधी कारवायांप्रकरणी पक्षातून निलंबित केलं. त्यांच्या या कृतीमुळे सुरुवातीला पक्षातील अनेकांना धक्का बसला. पण यामुळे अडवाणींच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयास सुरुवात झाली.
पण अंतर्विरोधामुळे हे सरकार फार काळ टिकलं नाही. जनता पार्टीच्या बरखास्तीनंतर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींनी समविचारी नेत्यांची मोट बांधून 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. 1986 पर्यंत वाजपेयी पक्षाचे अध्यक्ष, तर अडवाणी महासचिव होते.
जनसंघापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1951 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी जनसंघाची स्थापना केली. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने अडवाणी जनसंघाशी जोडले गेले.
राजस्थानमध्ये जनसंघाचं काही काळ काम केल्यानंतर 1957 मध्ये अडवाणी दिल्लीत आले. त्यानंतर लवकरच त्यांना जनसंघाच्या सचिव आणि अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. जनसंघाच्या विविध पदावर काम केल्यानंतर, कानपूरमधील कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाने त्यांना अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी दिली.
1990 चं दशक अडवाणींच्या राजकीय कारकीर्दीसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. कारण, व्ही.पी.सिंग सरकारने मंडल कमिशनच्या शिफारसी लागू केल्याने याविरोधात देशभरात उग्र स्वरुपाचं आंदोलनं सुरु झालं. अनेक ठिकाणी तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते. याच काळात म्हणजे 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरु करुन, हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला. या यात्रेदरम्यान त्यांना अटक झाली. पण त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकाधिक वाढली.
पण 1998 मधील सरकाचा पाठिंबा अण्णाद्रमुकं आणि जयललिता यांनी काढल्यामुळे ते सरकार काही दिवसातच पडलं. यानंतर 1999 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपला मोठं यश मिळालं. यावेळी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी गृहमंत्री आणि नंतर देशाचे उपपंतप्रधान होते. (सर्व फोटो : लालकृष्ण अडवाणी ट्विटर अकाऊंट)
1990 मधील लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेने देशभरात हिंदुत्वाचे वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने सुरु केलेल्या कार सेवेत लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते कारसेवेसाठी अयोध्येत जमू लागले. 1992 मधील कारसेवेदरम्यान हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडली. त्याप्रकरणी ज्या लोकांवर दोषारोप पत्र ठेवण्यात आलं, त्यात लालकृष्ण अडवाणींच्याही नावाचा समावेश करण्यात आला.
लालकृष्ण अडवाणींचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी पाकिस्तानच्या कराचीत झाला. पण फाळणीनंतर ते भारतात आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -