मुंबई : पाकिस्तानी कलाकारांना मुंबई सोडून जाण्याचा इशारा मनसेने दिला असतानाच आता 'झी' समूह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. झी वाहिनीवरील पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करण्याचा विचार असल्याचं 'झी' आणि 'एस्सेल ग्रुप'चे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी बोलवून दाखवलं आहे.


'झी जिंदगी' या वाहिनीवरुन पाकिस्तानी मालिका प्रसारित होतात. या मालिका बंद करण्याचा विचार असल्याचं सुभाष चंद्रा यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांनी निघून जायला हवं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रात अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं चंद्रा म्हणाले.

झी जिंदगीवर सध्या 'बिन तेरे', 'एक तमन्ना लहसील सी', 'फात्मागुल', 'मै हरी पिया' या मालिका प्रसारित होतात. दोन वर्षांपूर्वी 'जिंदगी गुलजार है' ही अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका असलेली मालिका प्रचंड गाजली होती.

उरी हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग आला असताना, मुंबईतही पाकिस्तानविरोधातील रोष वाढत आहे. जम्मू काश्मीरमधील उरी इथं अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले.

दुसरीकडे, पाकिस्तानी कलाकार असलेले ऐ दिल है मुश्किल आणि रईस हे सिनेमे प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. ऐ दिल है मुश्किल या सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली असून, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तर शाहरुख खानचा रईस सिनेमात माहिरा खान ही पाकिस्तानी अभिनेत्री झळकणार आहे. त्यामुळे त्याला ‘मनचिसे’ने विरोध केला आहे.

https://twitter.com/subhashchandra/status/779521129568346112

संबंधित बातम्या :


शाहरुखच्या 'रईस'ला मनसेचा विरोध


48 तासात मुंबई सोडा, पाकिस्तानी कलाकारांना मनसेची धमकी