सध्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी मैदान सज्ज झाले असून या निवडणुकीत सिद्धूंचा 'आवाज-ए-पंजाब' हा पक्षही उतरला आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सिद्धू कोणत्या पक्षात जाणार, याबाबत विविध तर्क लढवले जात होते. मात्र, सिद्धूंनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करुन या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला होता. सध्या सिद्धूंचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याने, त्यांनी आपले सर्व लक्ष या निवडणुकीवर केंद्रीत करण्यासाठी कपिलच्या शोला रामराम केला आहे.
याबाबत माहिती देताना सिद्धूच्या पत्नी नवज्योत कौर म्हणाल्या, ''सिद्धू यांनी ३० सप्टेंबरपर्यंतच्या भागांचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. यानंतर ते स्वत:ला राजकारणात झोकून देणार आहेत. त्यामुळे त्यांनी आता या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.''
सिद्धूंच्या या कार्यक्रमाला रामराम ठोकण्याने कार्यक्रमाच्या ‘टीआरपी’वर आता कितपत परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.