मुंबई :  छोट्या पडद्यावर अल्पावधितच चाहत्यांच्या पसंतीला उतरलेली मालिका 'तुला पाहते रे' मालिका बंद होणार अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरली आहे. मात्र ही मालिका बंद होणार नाही, असे स्पष्टीकरण खुद्द या मालिकेचा हिरो विक्रांत सरंजामे म्हणजेच अभिनेता सुबोध भावेने दिले आहे.


ही मालिका बंद होणार किंवा सुबोध प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चा होत्या. मात्र ही मालिका सुरुच राहणार असल्याबाबत सुबोधने ट्विट केले आहे. ''ज्या मालिकेने मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला. झी मराठी आणि आमच्या निर्मात्यांनी पुन्हा तुमच्या समोर यायची संधी दिली ती मालिका तुला पाहते रे मालिका मी सोडत नाहीये किंवा ती मालिका अकाली बंद ही होत नाहीये.'' असे सुबोधने ट्विट करत म्हटले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी ही मालिका बंद होणार ही केवळ अफवा असल्याचे सुबोधने स्पष्ट केले आहे.


सुबोध भावे, गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेली 'तुला पाहते रे' मालिका गेल्या ऑगस्टमध्ये सुरु झाली आहे. सुरु झाल्यापासून मालिका सातत्याने टीआरपीमध्ये वरच्या क्रमांकावर राहिली आहे.

मागे एका मुलाखतीत सुबोधने तब्येतीच्या कारणावरुन  'तुला पाहते रे'  ही मालिका आणखी काही महिने चालू राहील. या मालिकेचा निरोप घेईपर्यंत तरी दुसरं कुठलं काम हाती घेतलं नाहीये, असं विधान केलं होतं.  तेव्हापासून ही मालिका बंद होणार किंवा सुबोध प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चा होत्या.