Premachi Goshta : गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे त्या मुक्ता-सागरचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या विवाह सोहळा विशेष भाग पाहायला मिळत आहे. मेहंदी, संगीत आणि हळद तर थाटात पार पडली आहे. आता उत्सुकता आहे ती लग्नाची. गोखले आणि कोळी कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून विवाहसोहळ्यात खास पाहुणेही येणार आहेत. 


अलिबागच्या कोळीवाड्यात पार पडलं मुक्ता-सागरचं केळवण


मालिकेत लग्नाची धामधूम पाहायला मिळेलच. पण पडद्यामागेही मुक्ता-सागरच्या लग्नासाठी प्रेक्षकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अलिबागमधल्या कोळीवाड्यात नुकताच मुक्ता-सागरचं केळवण पारंपरिक पद्धतीने पार पडलं. सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकर यांनी मुक्ता, सागर, इंद्रा आणि चिमुकल्या सईला सुग्रास जेवणाची मेजवानी दिली. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतल्या कलाकारांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोळीवाडा सजला होता. कोळी गाण्यांच्या ठेक्यावर कलाकारांचं स्वागत झालं आणि रंगला सुग्रास केळवणाचा बेत. अलिबागकरांचं प्रेम पाहून मुक्ता-सागर भारावून गेले.


केळवणाच्या या खास दिवशी मुक्ताने खास उखाणाही घेतला. ‘नलिनी काकुंनी आमंत्रण देऊन प्रेमाची गोष्ट केली मोठी. स्टार प्रवाहच्या साक्षीने भरली मुक्ताची खणा नारळाने ओटी. अलिबागकरांनी घातलाय सागर-मुक्ताच्या केळवणाचा घाट. पहाण्यासाठी सई सुद्धा पोहोचली धरुन इंद्रा आजीचा हात.’ मुक्ताच्या या उखाण्याने केळवणाच्या कार्यक्रमाची सांगता झाली आणि कलाकारांनी पुन्हा मुंबई गाठली. 


थाटात पार पडणार मुक्ता-सागरचा विवाहसोहळा


हो नाही म्हणता म्हणता अखेर मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. खरतर दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे. गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही असणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागर सोबतच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत.


अर्जुन-सायलीची खास हजेरी


मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ठरलं तर मग मालिकेतले अर्जुन-सायली लावली खास हजेरी लावणार आहेत. यासोबतच लग्नात सावनीची देखिल एण्ट्री होणार आहे. सावनीच्या येण्याने बरंच नाट्यही रंगणार आहे. त्यामुळे लग्न निर्विध्नपणे पार पडणार का? याची उत्सुकता नक्कीच असेल. 


संंबंधित बातम्या


Premachi Goshta: थाटात पार पडणार मुक्ता आणि सागरचा संगीत सोहळा; 'हे' कलाकार लावणार हजेरी