येत्या 25 मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. केतकीच्या व्यक्तिरेखेला टीआरपी नसल्यामुळे तिला रिप्लेस केलं, असं निर्मात्या सौ. संगीता सारंग म्हणतात. तर आपल्या एपिलेप्सी या आजारामुळे पाळाव्या लागणाऱ्या पथ्यामुळेच आपल्याला सीरिअलमधून काढलं असा दावा केतकी करते. खरंतर काही महिन्यांपूर्वीच या मालिकेच्या कलाकारांची नवी करारपत्रं झाली होती. त्यानुसार पुढच्या वर्षापर्यंत ही मालिका चालू ठेवण्यात येणार होती. पण या वादामुळे थेट मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. आता ही मालिका जाऊन तिथे 'लक्ष्मी नारायण' ही मालिका येतेय.
सेटवरुन कळलेली आतली बातमी अशी की ही 'लक्ष्मी सदैव मंगलम' मालिका खरंतर 20 तारखेलाच संपणार होती. पण 'लक्ष्मी नारायण'चं काम अर्धवट असल्यामुळे आणखी पाच दिवस या मालिकेला वाढवून देण्यात आले आहेत. आता 25 तारीख शेवटची ठरवली. पण, तरीही नव्या मालिकेचे अपेक्षित भाग पूर्ण होत नाहीयत. मग 'लक्ष्मी सदैव मंगलम' मालिकेला अजून काही दिवस वाढवून द्यायचा विचार चॅनल करतंय.
पण आता मात्र निर्मात्यांनी चॅनलला आवरतं घेण्याचा सल्ला दिलाय. दुसरी मालिका तयार नाही म्हणून आपण मालिका वाढवत ठेवणं योग्य नाही. मालिकेल्या कलाकारांनी इतर कामं घेतलीत. शिवाय ही मालिका वाढवत नेण्यातला इंटरेस्टही आता इतिहासजमा झालाय, असं निर्मात्यांनी चॅनलला स्पष्ट सांगितलंय. परंतु निर्माता आणि चॅनलच्या वादात कलाकारांची मात्र चांगलीच गोची झाली आहे.