Kiran Mane:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. नुकतीच किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर करुन जवान या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हरिवंश राय बच्चन, अमिताभ बच्चन आणि विविध चित्रपटांचा उल्लेख केला आहे.


किरण माने यांची पोस्ट


किरण माने यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते शाहरुखच्या जवान चित्रपटाच्या पोस्टरसमोर शाहरुखसारखी पोज देऊन उभे राहिलेले दिसत आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,


हरिवंश राय बच्चन रोज रात्री झोपायच्या आधी व्हिसीआर वर बच्चनसायबांचा कुठलातरी एक पिच्चर बघून मग झोपायचे.खरंतर हरिवंश राय बच्चन हे अभिजात कवी. 'मधुशाला' सारख्या क्लासिकची भारतातील महान काव्यामध्ये गणना होते. अमिताभला वाटायचे, 'आपले पिच्चर तद्दन मसाला. 'लाॅजिक बिजिक' गुंडाळून ठेवून पिटातल्या पब्लीकसाठी बनवलेले. आपल्या बुद्धीवादी बाबूजींना त्यात काय आवडत असेल?' त्यावर हरीवंशरायजींनी जे उत्तर दिलं, ते लै भारी होतं. ते म्हन्ले, "बेटा, आपली बहुतांश जनता गोरगरीब आहे. महागाई, बेरोजगारीनं त्रासलेली आहे. कामावर मालकही शोषण करतो. त्यांना मनोमन वाटतं बंड करुन उठावं. तू तीन तासापुरता अशा भारतीयांचा 'मसीहा' बनतोस. त्यांना 'पोएटिक जस्टिस' मिळवुन देतोस ! ते या समाधानात थिएटरबाहेर पडतात की 'आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शेवटी सत्य, मानवता,प्रामाणिकपणा विजय होतो. दुष्टांचा खातमा होतो.'


आजच्या भवतालात अशा 'मसीहा'ची गरजय. बच्चनही 'बच्चन' राहिला नाही. ती कमी शाहरूखनं भरुन काढली. सर्वसामान्य प्रेक्षकांना जातपात, धर्म वगैरेंशी काहीही घेणंदेणं नाय. त्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत पडलीय. तीस-चाळीस हजारांच्या कर्जाच्या ओझ्यानं दबून शेतकरी आत्महत्या करतात, तर दूसरीकडं बड्या उद्योगपतींचं चाळीस हजार कोटींचं कर्ज माफ होतं. सरकारी हाॅस्पीटल्समध्ये सुविधांच्या अभावापोटी असंख्य चिमुरड्यांपास्नं वयोवृद्धांपर्यन्त किड्यामुंगीसारखे मरतायत. महागाई, बेरोजगारी वाढतच चाललीय. बाॅर्डरवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या हातातही अतिशय निकृष्ट दर्जाच्या रायफली असतात. नवनविन सरकारं आपण निवडून देतो, पन निवडणुकांमध्ये जी आश्वासनं दिली जातात, त्यांना नंतर हरताळ फासला जातो. अशा परिस्थितीत 'जवान'नं सगळ्या भारतीयांच्या मनोरंजनासोबतच, मनात खदखदत असणार्‍या गोष्टींना वाचा फोडली आहे... खर्‍या समस्या सोडवून 'न्याय' पण मिळवून दिला आहे. सिनेमात का होईना 'काला धन' परत मिळवून गोरगरीबांच्या खात्यात जमा करण्यापास्नं लोकप्रतिनिधी, मंत्र्यासंत्र्यांना गुडघ्यावर आणून अत्यावश्यक सेवांबद्दल जाब विचारण्यापर्यन्त सगळं-सग्ग्गळं केलं त्यानं.


पूर्वीच्या काळी अशा आशयाचे अनेक सिनेमे येऊन गेलेत. पण आज हे मांडणं लै लै लै धाडसाचं आणि गरजेचं आहे. त्याकाळात मुभा होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुल्यांची जपणूक होती. 'बायकाॅट ट्रेंड' नव्हता. त्यामुळं आज 'खर्‍याखुर्‍या' समस्यांवर परखडपणे बोलून वास्तवाचं भान देणार्‍या मनोरंजक फॅंटसीची लै लै लै गरज होती. प्रेक्षकांनी अक्षरश: दिवाळी-दसरा असल्यागत ही गोष्ट साजरी केली.


मनोरंजन करण्याबरोबर समाजभान असणारे कलावंत आज दुर्मिळ झाले आहेत. व्यवस्थेपुढं लोटांगण घालणार्‍या पायचाटू, लाळघोट्या सुमार कलावंतांची सद्दी आहे. त्यांच्या मुस्काडीत मारून पाठीचा कणा ताठ ठेवत, डोळ्यांत अंगार घेवून, फूल्ल ऑफ स्वॅगनं शाहरूख आलाय.


लै दिसांनी थिएटरमध्ये हिरोच्या एन्ट्रीला टाळ्या,शिट्ट्यांचा छप्परतोड दनका अनुभवला. लै दिसांनी "बेटे को हाथ लगाने से पहले..." सारख्या डायलाॅगला प्रेक्षकांनी जल्लोष केलेला पाहिला. लै दिसांनी आमचा खराखुरा 'हिरो' आम्हाला दिसला !आनंदाचे डोही आनंद तरंग घेऊन थिएटरबाहेर पडलो.  मन भरलं नव्हतं. जाता-जाता शाहरूखच्या पोस्टर समोर सेल्फी काढायला रांग लागली होती. मी बी त्यात सामील झालो... कारण आम्हा सर्वांना तीन तासात 'पोएटिक जस्टीस' मिळाला होता !'



शाहरुखच्या 'जवान'  या चित्रपटात  नयनतारा,विजय सेतुपती,संजय दत्त, सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा आणि एजाज खान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.  गेल्या काही दिवसांपासून किरण माने हे 'जवान'  चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत.


संबंधित बातम्या:


Shah Rukh Khan: 'अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा!' किरण मानेंकडून शाहरुखचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, 'नानावटी हॉस्पिटलमध्ये...'