Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  'बिग बॉस मराठी'च्या घरात टास्कच्या (Bigg Boss Marathi Season 5) दरम्यान वाद-भांडण होताना दिसतात. या सीझनमध्ये जोरदार वादावादी होत आहेत. गुरुवारी प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये कॅप्टन निवडण्याच्या टास्कमध्ये आर्या जाधव (Aarya Jadhao) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli)  मध्ये झालेल्या वादावादीत जोरदार राडा झाला. आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावली. तर, दुसरीकडे निक्कीला अद्दल घडायला हवी होती असे म्हणत नेटकऱ्यांनी आर्याचे कौतुक केले आहे. आर्याला घराबाहेर काढल्यास बिग बॉस मराठी पाहणे बंद करणार असल्याचा इशारा नेटकऱ्यांनी दिला. 


'बिग बॉस'च्या घरात वादाचं टोक गाठलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात  कॅप्टन्सीचा टास्क पार पडत होता. या टास्क दरम्यान आर्या आणि  निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आर्या आणि निक्कीमध्ये वादावादी होण्याआधी निक्कीने अंकिता आणि पंढरीनाथ कांबळी अर्थात पॅडीदादा यांनाही टास्कच्या दरम्यान धमकी दिली होती. अंकिता आणि निक्कीमध्ये सौम्य झटापटही झाली होती. तर, निक्कीने टास्कमधील जादूई हिरा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, हाती काहीच न लागल्याने निक्की हताश झाल्याचे दिसून आले. 


काय झालं नेमकं?


नव्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या आणि निक्की यांच्यात जोरात जुंपली. निक्की आणि आर्याच्या या भांडणाचे रूपांतर नंतर झटापटीत आणि त्यानंतर कानशि‍लात लगावण्यापर्यंत गेले. कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने 'बिग बॉस'ला सांगितले की, "आर्याने मला मारलंय...मी हे सहन करू शकत नाही". बिग बॅास यांनी आर्याच्या या कृत्याचा निषेध केला असून यात तिला काय शिक्षा होईल हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. 


नेटकऱ्यांनी दिला आर्याला पाठिंबा...


बिग बॉसच्या घरात मारहाणीला कोणतेही स्थान नाही. बिग बॉसकडूनही आर्याचा निषेध करण्यात आला. पण, दुसरीकडे नेटकऱ्यांनी आर्याला पाठिंबा दर्शवला आहे. शिक्षा म्हणून जर आर्याला बाहेर काढलं तर  आम्ही बिग बॉस पाहणे बंद करणार असल्याचे म्हटले. एका युजरने आर्याने निक्कीला मारल्याने मन सुखावलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर, आर्या आज खरोखर अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला खुश केलं असल्याचे युजरने म्हटले. एका प्रेक्षकाने म्हटले, जर आर्याला शिक्षा झाली तर अरबाजलाही शिक्षा झाली पाहिजे. त्याने अभिजीतलाही धक्काबुक्की केली होती. तर, आणखी एकाने म्हटले, आर्याने जे काय केलं ते चांगलंच केलं. जाळ अन धूर संगच काढला. नाद खुळा मराठमोळी आर्या... तर, बिग बॉसला आर्याने मारलेले दिसलं मग ते अरबाज अभिजीत दादाच्या कॉलर पकडून ढकलून दिले ते तेव्हा नाही दिसलं का असा थेट सवालच केला आहे.  अरबाज, निक्की एवढ्या वेळा धक्का बुक्की करतात तर आर्याने धक्काबुक्की केल्यावर ही का रडते.  आर्याला बाहेर काढले तर बिग बॉस मराठी पक्षपाती आहेत असे आम्ही समजू असेही एका युजरने म्हटले. 








तर, आर्याचे वागणं चुकीचे होते, त्यामुळे तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असा काहीसा सूरही नेटकऱ्यांमध्ये उमटला. त्यामुळे आता बिग बॉस काय निर्णय घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.