मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सिझनचं पहिलं एलिमिनेशन रविवारी झालं. अभिनेत्री आरती सोलंकीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. घरातून बाहेर पडल्यानंतर 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत आरतीने बिग बॉसच्या घरातील सदस्यांची पोलखोल केली आहे. भाऊ मानलेल्या भूषण कडूने आपली इमेज खराब केल्याचा दावा आरतीने केला, तर जुई गडकरी गेमर असल्याचं मत तिने व्यक्त केलं.


बिग बॉसच्या घरात आठवडाभर राहिले असले, तरी माझ्या मागे कोण काय बोललं, कोणाचे माझ्याबद्दल काय विचार आहेत, 24 तासांपैकी प्रेक्षकांना काय-काय दाखवलं, हे सर्व आता एपिसोड बघून समजून घेणार आहे, असं आरती म्हणाली.

स्मिता आणि अनिल थत्तेंमुळे आऊट

अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि पत्रकार अनिल थत्ते यांनी मला पहिल्या दिवशी नॉमिनेट केलं. माझं बोलणं चीप लेव्हलचं असल्याचं सांगत थत्तेंनी मला नॉमिनेट केलं. या दोघांच्या मतांमुळेच मी एलिमिनेट झाले, असं आरती सांगते.

थत्तेंविषयीचा आदर गेला

अनिल थत्तेंशी मी नंतर बोलले. मी आहे तसं वागले, खरी वागले, तर तुम्हाला आवडत नाही का असा प्रश्न मी त्यांना विचारला. तुम्ही मला ज्या पातळीवर नेलंत. त्यामुळे माझ्या मनातील तुमच्याविषयीचा रिस्पेक्ट गेला. माझ्या मनात तुमच्याविषयी आदरच होता, पण मी तुम्हाला आता तुमच्यामागे पोपट बोलते, असं आरतीने त्यांना सांगितलं.

तीन दिवसांनी अनिल थत्तेंनी आपली चूक मान्य केल्याचंही आरतीने सांगितलं. पहिल्या दिवसाऐवजी तीन दिवसांनी नॉमिनेशन झालं असतं, तर आपण निश्चितच तुला नॉमिनेट केलं नसतं, असं अनिल थत्ते म्हणाल्याचं आरती सोलंकीने सांगितलं.

स्मिता गोंदकर दुटप्पी

स्मिता गोंदकर माझी मैत्रिण आहे, ती इनोसंट असल्याचं दाखवते. पण सगळ्यांना माहित आहे की स्मिता सारखी मेकअप करत असते. ती स्वतःच्याच विश्वात असते. माझं विनोदी असणं तिला पटत नाही. ती स्वतः मला जाडू बोलते, पण मी तिला बोलले की ती शारीरिक टिपणी असल्याचा कांगावा करते, असंही आरतीने सांगितलं.

केळेवाडीपासूनच भावड्या म्हणून आरतीचं अभिनेता भूषण कडूशी वेगळं नातं होतं. दोघांनी बिग बॉसच्या घरातही एकत्र प्रवेश केला. मात्र अवघ्या आठ दिवसांतच दोघांमधलं नातं बदलल्याचं पाहायला मिळालं.

भूषणने गेम केला

'खरा गेम खेळला भूषण कडूने. मनोरंजन करण्यात त्याने डॉमिनन्स मिळवला. त्याने घरच्या सदस्यांच्या मनात ग्राऊंड तयार करुन ठेवलं. ते फुटेज दिसलं नसावं. पण त्याने ना मला, ना मेघाला, ना पुष्करला मनोरंजन करु दिलं.' असं आरती सांगते.

भूषणला फॅन फॉलोईंग चांगलं असल्यामुळे त्याला मतं जास्त मिळाली असतील. मधल्या सहा वर्षांच्या कालावधीत मी कमी दिसले, त्यामुळे मला मतंही फारशी पडली नाहीत. मी, भूषण आणि अनिल थत्ते उरले असताना बहुतेकांनी भूषणच्या बाजुने मत दिलं. पण शेवटी जेव्हा अनिल थत्ते आणि मी उरले होते, तेव्हा थत्तेंचं नाव घ्यायचं नाही म्हणून सर्व 13 जणांनी माझं नाव घेतलं, अशी खंत आरतीने व्यक्त केली.
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला दमदार सुरुवात

भूषणच्या वागण्याचा खूप त्रास झाला. त्याने माझी इमेज खराब केली. एलिमिनेशनच्या वेळी एकटी आऊ बोलली की मी खरी आहे. पण भूषण म्हणतो की मी विचार करुन बोललं पाहिजे. तो बोलू शकला असता की मी खरी आहे, पण त्यानं तसं न बोलल्याने माझी प्रतिमा महाराष्ट्रासमोर मलीन झाली, अशी नाराजी आरतीने व्यक्त केली.

कॅप्टन होण्यासाठी एन्टरटेनमेंट, टास्क आणि किचन असे तीन निकष होते. मग मी त्याला विचारलं मी या निकषात बसत असताना माझ्याऐवजी स्मिता गोंदकरचं नाव का घेतलं, स्मिता डोळे शेकवायला हवी का? असा प्रश्न विचारल्याचं ती सांगते.

जुई गडकरी गेमर

जुई गडकरी सगळ्यात जास्त गेम खेळते, असा दावा आरती सोलंकीने केला. ती डेली सोप असल्यासारखी वागते. एक अत्यंत चांगली सून असल्याची भूमिका ती करत आहे. मी तिला याबाबत एकदा विचारलंही. कदाचित बाहेर पडल्यावर ती हे मान्य करेलही, असं आरती म्हणते. ती डोळ्यातून इशारे करते. हे मीच नाही, तर मेघा, ऋतुजा, आणि आऊ यांनाही कळल्याचं सांगते.

आऊशी खास नातं

इंडस्ट्रीत असल्यापासून उषा नाडकर्णी यांची मी लाडकी आहे, हे माहितच होते. आऊ घरात आल्या तेव्हा आपलं कोणीतरी आहे, असं मला वाटलं.

घरात ग्रुप्स आहेत

रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे, सुशांत शेलार, आस्ताद काळे आणि भूषण कडू हा एक ग्रुप आहे. रात्र-रात्र बसून ते बोलायचे. ते काय बोलायचे हे माहित नाही. पण कॅमेरा आहेत, हे माहित असल्यामुळे ते लक्ष खेचून घेतात. रेशम तर ऋतुजाची नक्कल करते.

हिंदी बिग बॉसला जायचं होतं

हिंदी बिग बॉसचे पाच सिझन मी पाहिले. मला तिथे जायचंच होतं. हिंदीत सामान्य व्यक्ती म्हणून मी जाणार होते. मराठी बिग बॉस आणि त्यातही पहिला सिझन म्हटल्यावर मी येणारच होते. एकप्रकारे माझी स्वप्नपूर्तीच झाली, असं आरती म्हणते.

नो स्ट्रॅटेजी हाच माझा प्लान होता. जसे आहोत तसे राहायचे, हे मी ठरवलं होतं. मलाही वाटलं होतं, की सूचना देतील. पण घरात कोण असणार, काय टास्क आहेत, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. ते अक्षरशः सोडून देतात, जे घडतं ते खरं दिसतं. यांच्या तर टॉयलेटमध्येही माईक आहेत, असं आरतीला वाटतं. मला जेवण व्यवस्थित लागतं. त्यामुळे मी किचनमध्ये असायचं, असं आरती सांगते.

सगळेच स्ट्राँग

बिग बॉस कोण जिंकेल, याबाबत आता काहीच सांगू शकत नाही. मी किमान पाच आठवडे तरी टिकेन, असा आत्मविश्वास होता.
इथे काहीही होऊ शकते. स्पर्धा आहे म्हटल्यावर प्रत्येक गेम खेळणार, हे साहजिक आहे. जिंकायचं म्हणजे स्पर्धक म्हणून प्रत्येक जण एकमेकाचा पाय खेचणार, असं आरतीला वाटतं.

आता मला माणसं कळली आहेत. मात्र परत बिग बॉसच्या घरात जायची संधी मिळाली, तर जशी पहिल्यांदा एन्ट्री घेतली, तशीच खरी वागणार. पण आधी खेळले नाही तसा गेम खेळणार. ना माझा भावड्या, ना कोणी माझी मैत्रिण, असा निर्धार आरतीने केला.

पाहा व्हिडिओ :