भीवाच्या कर्तृत्वाबद्दल रामीला कल्पना असली तरी लग्नापूर्वी दोघांची भेट झाली नव्हती. त्याकाळी तशी प्रथाच नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दिवशी आपल्या होणाऱ्या पतीला पाहण्यासाठी रामी आतुर झाली होती. हे हळवे क्षण मालिकेतून टिपण्यात आले आहेत. अगदी उखाण्यापासून, गृहप्रवेश, नव्या घरात जुळवून घेण्याचा रामीचा प्रयत्न हे भावनिक प्रसंग मालिकेतून पहायला मिळतील. मृण्मयी सुपाळ या मालिकेत बालपणीच्या रमाईंची भूमिका साकारत आहे.
1907 साली रमाबाई आणि भीमरावांचा विवाहसोहळा भायखळा येथील मासळी बाजारात पार पडला. तो काळ जसाच्या तसा उभा करण्याचा प्रयत्न 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेच्या संपूर्ण टीमने केला आहे. बाबासाहेबांच्या विवाहाप्रसंगी तुफान पाऊस असल्याचा संदर्भ काही पुस्तकांमध्ये आहे. योगायोग असा की 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत विवाहप्रसंग शूट होत असतानाही मुसळधार पाऊस होता. मात्र संपूर्ण टीमच्या योग्य नियोजनामुळे शूटिंग निर्विघ्नपणे पार पडलं. कलाकारही उत्साहाने या सोहळ्याचा आनंद घेत होते.
भीवाच्या वडिलांची म्हणजेच रामजी बाबांची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद अधिकारी यांनी चाफ्याच्या फुलापासून अंगठी बनवत सर्व कलाकारांना खास भेट दिली. पडद्यावर दिसणाऱ्या या कुटुंबाचं खऱ्या आयुष्यातही घट्ट नातं बनलंय. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेच्या निमित्ताने कलाकार म्हणून समृद्ध होता येतंय हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे.