मुंबई : नाटकादरम्यान प्रेक्षकांचे मोबाईल वाजून नाटकात व्यत्यत येऊ नये, यासाठी अभिनेता सुबोध भावे आता डोअरकीपरचं काम करणार आहे. नाट्यगृहातील प्रेक्षकांच्या मोबाईल वापरामुळे संतापलेल्या सुबोध भावेने 'एबीपी माझा' सोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. 'अश्रूंची झाली फुले' या नाटकादरम्यान प्रेक्षकाच्या मोबाइलची रिंगटोन वाजल्यानंतर सुबोधने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नाटकादरम्यान प्रेक्षकांचे मोबाईल असेच वाजत राहणार असतील तर मी नाटकात काम करणार नाही, असा इशारा सुबोधने दिला होता.


'एबीपी माझा' सोबत बोलताना सुबोध भावे म्हणाला, "नाटक हे फक्त नटांचं नसतं. नाटकातून मिळणारा आनंद हा तुमचा हक्क असतो. तो आनंद घेताना तुम्हाला मोबाइल फोन काही तासांकरता बंद केला पाहिजे किंवा सायलेंटवर ठेवला पाहिजे". तसेच आजपासून आपण नाटक सुरू होण्यापूर्वी डोअरकीपर म्हणून प्रेक्षकांचे मोबाइल फोन बंद किंवा सायलेंट आहेत का? हे तपासणार आणि मग नाटकाला सुरुवात करणार आहोत, असंही सुबोध म्हणाला.


नाटकादरम्यान प्रेक्षकांचा मोबाईल वाजल्याच्या प्रकारांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाट्य कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. त्यात आता अभिनेता सुबोध भावे याची भर पडली आहे. नाटकादरम्यान ज्या प्रेक्षकांचे मोबाईल वाजतात, जे प्रेक्षक मोबाईल वापरत असतात त्यांच्यावर सुबोध भावे संतापला आहे.