Vaishali Takkar Death : स्टार प्लसवरील प्रसिद्ध टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्याने चंदेरी दुनिया पुन्हा एका सुन्न झाली आहे. अवघ्या 30 वर्षीय वैशालीचा मृतदेह इंदूरच्या साईबाग कॉलनीतील तिच्या घरी आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशालीने आज  गळफास घेत आत्महत्या केली. 


वैशालीची सुसाईड नोटही सापडली आहे. इंदूरचे एसीपी मोतीउर रहमान यांनी सांगितले की, वैशाली ठक्करची एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये तिचा जुना प्रियकर तिला त्रास देत होता. त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वैशाली ही उज्जैनमधील महिदपूर येथील रहिवासी असून ती एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती.


लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले


वैशालीचे गेल्या वर्षी 26 एप्रिल रोजी केनियातील दंत शल्यचिकित्सक डॉ. अभिनंदन यांच्याशी साखरपुडा झाला होता. जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याची माहिती अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करून दिली. दोघेही जून 2021 मध्ये लग्न करणार होते. तथापि, अभिनेत्रीने एका महिन्यानंतर लग्नाची तारीख पुढे ढकलली. वैशालीने आपल्या निर्णयामागे कोरोना वाढीचा हवाला दिला होता. एका मुलाखतीत वैशाली म्हणाली होती की, 'कोरोनामुळे अनेक लोक आपला जीव गमावत असताना अशा परिस्थितीत मी लग्न करू शकत नाही. पुढच्या वर्षी जर परिस्थिती चांगली झाली तर आम्ही लग्न करू.


स्टार प्लस शोमधून लोकप्रियता मिळाली


वैशाली ठक्करने स्टार प्लस शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये वैशालीने संजनाची भूमिका साकारली होती. 2015 ते 2016 या काळात ती या मालिकेत दिसली होती. प्रसिद्ध टीव्ही शो 'ससुराल सिमर का' मध्ये वैशालीने लीड स्टार सिमर आणि प्रेमची मुलगी अंजलीची भूमिका साकारली होती. वैशाली त्यानंतर ये वादा रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर्स, लाल इश्क आणि विष या अमृत, मनमोहिनी 2 सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली होती. 


नकारात्मक भूमिकेसाठी गोल्डन पेटल अवॉर्ड जिंकला


ससुराल सिमर का 2 मध्ये अंजली भारद्वाजची भूमिका साकारण्यासाठी तिला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन पेटल पुरस्कार देखील मिळाला आहे. वैशाली शेवटची 2019 च्या मनमोहिनी शोमध्ये दिसली होती.


शेवटची रक्षाबंधनच्या शूटिंगमध्ये दिसली होती


वैशाली शेवटची 'रक्षा बंधन : रसाळ अपनी भाई की ढाल' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवर दिसली होती. ही मालिका भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित होती. यामध्ये वैशालीने कनक सिंह ठाकूर यांची भूमिका साकारली होती. हा शो दंगल टीव्हीवर आला होता.


सुशांत, जिया आणि प्रत्युषा बॅनर्जी यांचीही आत्महत्या 


यापूर्वी सुशांत सिंह राजपूत, जिया खान, आसिफ बसरा, कुशल पंजाबी आणि प्रत्युषा बॅनर्जी या अभिनेते आणि अभिनेत्रींनीही आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला, स्वामी ओम, जेड गुडी या कलाकारांनीही जगाचा निरोप घेतला.


या 12 जणांनी आत्महत्या करून जीवन संपवले 


आतापर्यंत मनोरंजन क्षेत्रातील 13 कलांकारांनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली आहे. यामध्ये असिफ बसरा, कुशल पंजाबी, तमिळ अभिनेत्री चित्रा, प्रत्युषा बॅनर्जी, संदीप नाहर, समीर शर्मा, प्रेक्षा मेहता, सुशील गौडा, मनमीत ग्रेवाल आणि सेजल शर्मा यांनी आत्महत्या करून आयुष्य संपवलं आहे. मात्र, यामधील अनेक आत्महत्या का आणि कशासाठी झाल्या? हे  गूढ कायम आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या