Dilip Prabhavalkar :  लेखनामध्ये असो की अभिनयामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याला प्राधान्य देणारे अष्टपैलू रंगकर्मी दिलीप प्रभावळकर ( Dilip Prabhavalkar) पुन्हा एकदा काही तरी नवीन करायला जात आहेत. विशेष म्हणजे प्रभावळकर पहिल्यांदा असं काही करणार आहेत जे त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये कधीच केलं नव्हतं. आता अनेकांना प्रश्न पडू शकतो की रंगभूमीवर बालनाट्यांपासून ते एकपात्री प्रयोगांपर्यंत आणि मालिकांपासून ते सिनेमांपर्यंत सर्व माध्यमांमध्ये आपली छाप पाडलेल्या प्रभावळकरांनी असं काय बरं केलं नसेल जे आता करत आहेत.


दिलीप प्रभावळकर पहिल्यांदा इंटरनॅशनल आदित्य बिर्ला सेंटर परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सादरीकरण करणार आहे. त्यांच्या बहुचर्चित पत्रापत्री या अभिवाचनाचा प्रयोग 9 नोव्हेंबर रोजी ऑपेरा हाऊसमध्ये होणार आहे. आतापर्यंत देश- परदेशातील अनेक थिएटरमध्ये सादरीकरण केलेल्या प्रभावळकरांनी याआधी कधीही ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये सादरीकरण केले नव्हते. त्यामुळे या प्रयोगासाठी ते स्वतः फार उत्सुक आहेत.


9नोव्हेंबरचा पत्रापत्रीचा प्रयोग इतका खास का?


आगामी प्रयोगाबद्दल बोलताना दिलीप प्रभावळकरांनी म्हटलं की, ‘पत्रापत्रीचे आतापर्यंत 25 प्रयोग झाले आणि येत्या 9 नोव्हेंबरला ऑपेरा हाऊसला प्रयोग आहे. ऑपेराच्या प्रयोगासाठी मी फार उत्सुक आहे. कारण मी यापूर्वी कधीच तिथे प्रयोग केले नाही. त्या वास्तुला एक ऐतिहासिक महत्त्व तर आहेच शिवाय एक परंपराही आहे. त्यामुळेच त्या दिवसाचा प्रयोग मला खूप समाधान देऊन जाईल हे निश्चित आहे. रंगभूमीवरील एका वेगळ्या प्रकारासाठी आणि वेगळ्या अनुभवासाठी सर्वांनी पत्रापत्री पाहायला हवं हे मी आवर्जुन सांगेन.’


पत्रापत्रीमध्ये नक्की कशाप्रकारची पत्रं आहेत?


पत्रापत्रीबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, ‘वाचन संस्कृतीला स्वतःचं असं महत्त्व आहे. पत्रातून व्यक्त होताना विचारांची देवाण- घेवाण तर होतेच शिवाय एक अंतरीचा संवादही होतो. हा अनुभव जर कोणाला घ्यायचा असेल तर पत्रापत्री पाहावं लागेल. विशेष म्हणजे पत्रापत्रीमध्ये अभिवाचन केली जाणारी पत्रं ही प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीची आहेत. वर्तमानकाळातही तेव्हा लिहिलेली पत्रं चपखल बसतात ही या पत्रापत्रीची जमेची बाजू आहे.’


पत्रापत्रीमध्ये कोणकोण आहे?


बदाम राजा प्रोडक्शन्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित पत्रापत्रीमध्ये एकूण पाच पत्रांचे अभिवाचन आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. यात तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा असून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करतात.आतापर्यंत 100 हून अधिक नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या विजय केंकरे यांच्यासाठी पत्रापत्री खास आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, प्रभावळकरांच्या पत्रापत्री पुस्तकाला साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला. सोलापुरात झालेल्या कार्यक्रमावेळी केंकरेही तिथे उपस्थित होते. तेव्हा पहिल्यांदा दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून त्यांनी पत्रापत्री पुस्तक वाचलं आणि यावर एक रंजक अभिवाचनाचा प्रयोग होऊ शकतो हे त्यांच्या डोक्यात आलं.


पत्रापत्रीच्या लेखनाला सुरुवात कशी झाली?


पत्रापत्रीच्या लेखनाबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, मी जेव्हा माधवराव आणि तात्यासाहेब यांची पत्रं लिहीत होतो तेव्हा मी माधवराव आणि तात्यासाहेब होऊन लिहित होतो. त्यामुळे त्यात लेखक आणि नट दोघंहा डोकावतात. ही पत्रापत्रीची जमेची बाजू आहे. मला नेहमी वाटतं की संगीताचा जसा कान असतो तशीच विनोद किंवा व्यंग टिपण्याची एक दृष्टी असते. याचा वापर मी या अभिवाचन दृक आविष्कारामध्ये पाहायला मिळतं.


दिग्दर्शक विजय केंकरेंसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?


पत्रापत्री निमित्ताने दिग्दर्शक विजय केंकरेंसोबत काम करण्याबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, ‘यापूर्वी मी विजयसोबत सई परांजपे यांच्या नांदा सौख्यभरे नाटकाचे अमेरिकेतील प्रयोग केले होते आणि जयंत दळवी यांच्या नाती गोती नाटकात आम्ही काम केलं होतं. याशिवाय विजयच्या दिग्दर्शनाखाली मी आतापर्यंत सातवेळा काम केलं आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांच्या कामाची पद्धत अगदी पूर्णपणे माहीत आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून माझी शक्तीस्थानं काय आहेत आणि माझ्या मर्यादा काय आहेत हे त्याला पूर्णपणे माहीत आहे. तसंच विजयला एका व्यक्तिरेखेतून नक्की काय हवंय हे मला पटकन कळतं. त्यामुळे ही संपूर्ण प्रोसेस फारच रंजक होती.’


ही बातमी वाचा : 


Salman Khan:जीवघेण्या धमक्या, काळवीट प्रकरणानंतर बिश्नोईंचा खळबळजनक प्रकार, सलमान खानसह सलीम खान यांचे पुतळे जाळले, नक्की प्रकार काय?