नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे अवघे 2 दिवस उरले असताना आज नागपुरात सर्वाधिक म्हणजेच 16 मोर्चे निघाले. एका बाजूला नागपुरात आज मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा निघाला. हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव त्यामध्ये सहभागी झाले, त्यामुळे हा मोर्चा संख्येच्या दृष्टीने लक्षवेधी ठरला. मात्र, आणखी एक मोर्चा संख्येच्या दृष्टीने लक्षवेधी ठरला. तो म्हणजे खाटीक समाजाचा मोर्चा. आता तो लक्षवेधी का ठरला हे ही जाणून घ्या. तर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात मोठमोठे मोर्चे काढून विविध संघटना, समाज घटक सरकारकडून त्यांच्या मागण्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात.


मात्र, नागपुरात आज निघालेला खाटीक समाजाच्या मोर्चात सहभागी लोकांपेक्षा त्या मोर्चाला सुरक्षा देणाऱ्या पोलिसांचीच संख्या तिप्पट होती. या मोर्चामध्ये अवघे 8 ते 10 लोकच सहभागी झाले होते. तर त्यांना सुरक्षा देण्यासाठी 25 पोलीस पायी आणि सोबत चालणाऱ्या गाडीमध्ये 10 पोलीस असे 35 पोलीस होते. विशेष म्हणजे या मोर्चाची मागणी ही आगळी वेगळी होती. बकऱ्याच्या मटणाला 350 रुपये किलो असा हमी भाव मिळावा, राज्य शेळी मेंढी मंडळाकडून खाटीक समाजाला योग्य भावात बकऱ्यांची आपूर्ती व्हावी अशा मागणीसाठी हा मोर्चा काढला गेला होता. सीए रोड वरून सुरुवात होऊन हा मोर्चा श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स पर्यंत सुमारे 3 किलोमीटर चालला. 35 पोलिसांच्या सुरक्षेमध्ये 10 ते 12 लोकांचा हा मोर्चा वेगळ्याच पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

हिवाळी अधिवेशनात काल विधानभवनावर एकूण 11 मोर्चे धडकले होते. यामध्ये सर्वात लक्षवेधी मोर्चा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचा ठरला होता. कालपर्यंत विधानभवनाजवळील मॉरिस टी पॉईंट वर आलेला ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांचा हा मोर्चा 30 तासांनंतरही तिथेच रस्त्यावर थांबून होता.  कृषी विद्यापीठ रोजंदार कामगार युनियनचा मोर्चा देखील लक्षवेधी होता. रोजंदारी स्थायी समितीच्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावं अशी मागणी कृषी विद्यापीठ रोजंदार कामगार यूनियनने केली होती.  याशिवाय साप्ताहिक ग्रामीण पत्रकार संघ, मजदूर युनियन,  पोलीस बॉईज असोसिएशन, विदर्भ प्राथमिक शिक्षण संघ, हिवताप हत्ती रोग योजनेच्या कर्मचाऱ्यांनी ही मोर्चे काढले होते.