Gayatri Datar : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेने सहा वर्षांचा लीप घेतला आहे. या लीपनंतर मालिकेच्या कथानकात अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या वाहिनीवर दाखवण्यात आलेल्या प्रोमोनुसार जयदीप आणि गौरी एकमेकांपासून दुरावल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जयदीप गौरीची पुन्हा भेट होणार का? याची उत्सुकता नक्कीच आहे. मात्र, मालिकेत लवकरच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. रुही कारखानीस असं या नव्या पात्राचं नाव असून अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 


नव्या भूमिकेबाबत गायत्री दातार म्हणाली...


या नव्या भूमिकेसंदर्भात बोलताना गायत्री म्हणाली, "रुही कारखानीस ही भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. खूप मोठ्या गॅपनंतर मी मालिकेत काम करत आहे. स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिलीच मालिका आहे. मालिकेतली माझी भूमिका आणि लूक खूपच वेगळा आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूसोबत मी एक रिऍलिटी शो केला होता. त्यामुळे गिरीजासोबत जुनी मैत्री आहे. त्यामुळे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होत असल्याची भावना गायत्रीने व्यक्त केली. 


मालिकेने घेतला सहा वर्षांचा लीप 


सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा प्रोमो पाहता, प्रोमोमध्ये असे दिसून येते की, सहा वर्षांच्या लीपमध्ये जयदीप आणि गौरी एकमेकांपासून दुरावताना दिसले आहेत. गौरी आणि जयदीप यांना लक्ष्मी नावाची मुलगी आहे. तर, गौरी जयदीप आणि लक्ष्मीची आतुरतेने वाट पाहतेय. तर दुसरीकडे, एका आलिशान बंगल्यात जयदीप आणि त्यांची मुलगी लक्ष्मी एकत्र राहताना दिसत आहेत. त्यामुळे मालिका नेमकं कोणतं वळण घेतेय, गौरी आणि जयदीपची भेट होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच, अभिनेत्री गायत्री दातार साकारत असलेल्या रुही कारखानीसच्या भूमिकेमुळे मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पार पडले 'विष-अमृत नॉमिनेशन कार्य'; 'हे' स्पर्धक झाले नॉमिनेट