Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची (Maharashtra Political Crisis )सुनावणी चार आठवडे लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नोव्हेंबर महिन्यानंतर आता पुढील सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. दोन्ही बाजूने कोणते मुद्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील कोणत्या मुद्यांवर युक्तिवाद करणार याची माहितीदेखील देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 


कोर्टात आज काय घडले?


सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याआधी दोन्ही बाजूने एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे असे घटनापीठाने म्हटले. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील या बाजू मांजू शकतात. शक्य असल्यास दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत. हे मुद्दे मोजकेच असावेत असेही कोर्टाने म्हटले.  


दोन्ही बाजूने कोणत्या मुद्यावर कोणते वकील युक्तिवाद करतील हेदेखील निश्चित करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. जेणेकरून युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाही. लिखित स्वरुपात मुद्दे दिल्याने घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास मदत होते, असेही कोर्टाने म्हटले. 


सुप्रीम कोर्टाने काय निर्देश दिले?


सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत दोन्ही पक्षकारांना निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, दोन्ही पक्षकार संयुक्तपणे लिखितपणे आपली बाजू मांडतील. त्याशिवाय, त्याला जोड असणारे कागदपत्रेदेखील जोडतील. जेणेकरून एक समान मुद्दे तयार होतील. येत्या चार आठवड्यात ही लिखित बाजू सुप्रीम कोर्टासमोर सादर करावी लागतील. घटनापीठासमोर उपस्थित होणारे अथवा निर्णय घेण्यासाठी जे मुद्दे मांडण्यात येतील ते घटनापीठासमोर संयुक्तपणे सादर करण्यात येतील.


आता पुढे काय होणार?


लिखितपणे बाजू मांडण्याचे निर्देश दिल्यानंतर चार आठवड्यात लिखित बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट सुनावणीची तारीख निश्चित करेल. ही सुनावणी 16 डिसेंबर आधी होणे आवश्यक आहे. अन्यथा नव्या वर्षात ही सुनावणी होईल. 16 डिसेंबर नंतर कोर्टाला नाताळाची सुट्टी असणार आहे. त्याशिवाय, सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड हे सूत्रे हाती घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या जबाबदारीच्या अनुषंगाने सुनावणीची तारीख निश्चित होईल असे जाणकरांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीत सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा कालावधी निश्चित होण्याची शक्यता आहे.