Belgaum : महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावांचा आजतागायत अविरत संघर्ष सुरु आहे. आज बेळगावमध्ये काळा दिन साजरा होत असतानाच महाराष्ट्र सरकारमधील एकही मंत्री किंवा नेता फिरकलेला नाही. त्यामुळे आपल्याच सीमा भागातील मराठी बांधवांना वाऱ्यावर सोडलं आहे का? असा संताप सीमाभागात व्यक्त केला जात आहे. यावेळी मराठी बांधवांनी एकटं पाडल्याचा आरोप केला.  


कर्नाटक दिवस साजरा केला जात असताना बेळगावमध्ये काळा दिवस पाळून निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी मराठी बांधवांनी एकही नेता बेळगावात न आल्याने खंत व्यक्त केली. शुभम शेळकेयांनी हा लढा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा असल्याचे म्हणाले. ते पुढे म्हणाले, आम्ही जेव्हा सीमा प्रश्न बोलत असतो तेव्हा तो बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसतो, तर तो महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा असतो. त्यामुळे याची जाण महाराष्ट्राने ठेवली पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिल्यांदा बेळगावात रक्त सांडले, त्यामुळे सीमावासियांच्या पाठिशी महाराष्ट्र किती खंबीर आहे हे दाखवून देण्याची गरज आहे. 


सर्व पक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून पत्र पाठवून किमान एक नेता उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील या ठिकाणी आले होते, मात्र येथील दबावामुळे त्यांना परत पाठवण्यात आले. मात्र, कोणत्याच पक्षाचा नेता सांगूनही फिरकला नसल्याचे ते म्हणाले. 


दरम्यान, बेळगावमध्ये 1 नोव्हेंबर 1963 पासून कर्नाटक सरकारने लोकांच्या मताच्या विरोधात जाऊन, जबरदस्तीने बेळगावात राज्योत्सव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी दिवाळी होती. पण दिवाळीचा पहिल्याच दिवशी कर्नाटक सरकारने मराठी भाषकांची गळचेपी करायला सुरुवात केल्याने लोकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. दिवाळीच्या दिवशी बेळगावातील लोकांनी कंदील न लावता, दिवे न पेटवता हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. नंतर कर्नाटक राज्य स्थापनेचा हा दिवस दरवर्षी काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. 


सीमा भागात दरवर्षी 1 नोव्हेंबरला मराठी भाषकांकडून निषेध पाळला जायचा. या दिवशी लोकांची रॅली, मोर्चे आणि आंदोलनं केली जायची. मराठी भाषकांच्या भाषेचा सन्मान न करता कर्नाटक सरकारने या लोकांवर कन्नड सक्ती केली. ज्या-ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या-त्या ठिकाणी मराठी भाषकांची गळचेपी सुरू झाली.  कर्नाटक सरकारने जरी कितीही गळचेपी केली तरी आजही बेळगावातील लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून हा लढा जिवंत ठेवला आहे. लोकशाहीच्या माध्यमातून देशातील सर्वाधिक काळ चाललेला हा लढा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या