Ashwini Kulkarni bold scenes controversy: मराठी इंडस्ट्रीत (Entertainment) असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, जे सिनेमाच्या शीर्षकामुळे, किंवा त्यातील डायलॉग किंवा बोल्ड सीनमुळे चर्चेत आले आहेत. काही वर्षांपूर्वी महेश मांजरेकर यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि सिनेसृष्टीत अक्षरश: खळबळ उडाली. 'नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' (Marathi Movie) या सिनेमात अनेक इंटिमेट आणि बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि काही प्रेक्षकांकडून टीकेची झोड उठली. या चित्रपटातील काही बोल्ड सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. विशेषत: अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीच्या (Ashwini Kulkarni) बोल्ड सीन्सची प्रचंड चर्चा झाली. अभिनेत्रीनं या सिनेमात काकीची भूमिका साकारली होती. दरम्यान, ट्रोलिंगचा कसा सामना केला? या प्रश्नावर अभिनेत्रीनं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं.
बोल्ड सीन्सबद्दल अश्विनी म्हणाली, 'मी याआधी बोल्ड भूमिका कधीही साकारलेली नव्हती. वाचन माझं चांगलंय, जयंत पवारांचं मी खूप साहित्य वाचलंय. त्यांच्या लिखाणावर आधारित हा सिनेमा येतोय हे ऐकून चांगलं वाटलं, मी या आधी नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हे पुस्तक वाचलं होतं. या पुस्तकावर आधारित महेश मांजरेकर चित्रपट तयार करत होते. त्यांनी मला भूमिकेसाठी विचारलं. मी ही भूमिका साकारेन, याचा कॉन्फिडेंस होता. पण याचे पडसाद काय उमटतील, यासाठी मी तयार नव्हते', असं अभिनेत्री म्हणाली.
'मी स्वत: अट्टाहासाने महेश सरांना काकीचा रोल करायचा आहे, असं सांगितलं होतं. त्यांनी स्क्रीनप्ले वाचून दाखवलं, उपस्थित सर्वांना प्रचंड आवडलं. तेव्हा मला त्यांनी या रोलसाठी वजन वगैरे वाढवावं लागेल, असं म्हणाले होते. पण मला काकी ही भूमिका साकारायला आवडेल, असं मी सांगितलेलं होतं. काकी हे पात्र खूप सुंदर आहे. एका मुलाचा तिरस्कार करण्यापासून, त्याच मुलाला प्रेम दाखवणं, तसेच मुलगा सोडून गेल्यावर वेड लागण्यापर्यंत... या पात्राचा खूप मोठा आलेख आहे. त्या भूमिकेचा एक प्रवास आहे. मला हे पात्र साकारताना खूप चांगलं वाटलं', असंही अश्विनी म्हणाली.
'महेश सरांचा पूर्ण सपोर्ट होता. कम्फर्टच्या बाहेर असं काही घडलेलं नाही, असं त्यांनी माझ्याकडूनही करवून घेतलेलं नाही. माझ्या कम्फर्टनुसार सगळं शूट झालंय. विशेष म्हणजे घरच्यांचा पाठिंबा होता. नवऱ्याला मी विश्वासात घेऊन मी शूट केलं. मला एवढीच भीती होती की मला जमेल की नाही. अपेक्षित होतं त्याप्रमाणे मला साकारता आला. परंतु, त्याचे जे परिणाम झाले, पण मी त्यासाठी तयार नव्हते..', असं अभिनेत्री म्हणाली.
'सगळ्यांनी मला तेव्हा सांभाळून घेतलं. मला खरंतर टीकेची भीती वाटलेली नाही, पण जे लोक जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले. ही गोष्ट मी सकारात्मकतेनं घेतलं, असं अभिनेत्री म्हणाली. 'नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा, हा चित्रपट केल्यानंतर अभिनेत्री म्हणून मी खूप प्रगल्भ झाले. अचानक असं वाटलं मी काहीतरी काम केलं. या सिनेमातील पात्र साकारताना मला कळालं की, मला काहीही येत नाहीये, ही तर सुरुवात आहे. इथून पुढे माझं शिकणं बाकी आहे. स्वत:ला चॅलेंज देऊन पहिल्यांदाच काहीतरी मी केलंय', असं अश्विनीने सांगितलं.
