Lok Sabha Result 2024 :  निवडणुकांची घोषणा, उमेदवारांच्या याद्या, प्रचाराचा धुरळा, मतदानाचा प्रक्रिया हे सगळे टप्पे पार करत अखेर आजचा निकालाचा (Lok Sabha Election 2024) दिवस उजाडला. अवघा देश सध्या या राजकीय निकालाची अगदी उत्सुकतेने वाट पाहतोय. अनेक राज्यांमध्ये ही निवडणूक अगदी अस्मितेची लढाई झाली होती. आता याच लढाईचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये लागेल. त्यातच यंदाची निवडणूक जितकी मुरलेल्या राजकीय नेत्यांनी गाजवली तितकीच ती कलाकारांनी देखील गाजवली. 


उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये कलाकार देखील या निवडणुकांच्या मैदानात उतरले. त्यामुळे कलाकार म्हणून ऐरवी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही मंडळी निवडणुकीच्या रिंगणात जनतेच्या पसंतीस उतरणार का हे आज स्पष्ट होईल. कंगना रणौत, मनोज तिवारी, हेमा मालिनी, रवी किशन, अमोल कोल्हे, शत्रुघ्न सिन्हा हे सेलिब्रिटी यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. 


छोट्या पडद्यावरील राम 'या' मतदारसंघातून रिंगणात


रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील राम म्हणजे अरुण गोविल हे या माध्यमातून घरोघरी पोहचले. त्यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री घेऊन कमळ हाती घेतलं आणि लोकसभेच्या रिंगणात एन्ट्री केली. मेरठ लोकसभा मतदारसंघातून अरुण गोविल हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यातच भाजपसाठी ही जागा फार महत्त्वाची असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान अरुण गोविल यांच्यासमोर समाजवादी पक्षाच्या सुनीता वर्मा यांचं आव्हान आहे. सुनीता वर्मा या मेरठच्या माजी महापौर आहेत. त्यामुळे या जागेवर कुणाचा निकाल लागणार हे  थोड्या वेळात स्पष्ट होईल. 


बॉलीवूड व्हाया मंडी, कंगना संसदेत जाणार?


बॉलीवूडची पंगा क्विन कंगनाने थेट लोकसभेचं तिकीट मिळवतच राजकारणात एन्ट्री केली. कंगनाला भाजपकडून तिच्या जन्मभूमीत म्हणजेच हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात कंगना बाजी मारणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. कंगनाच्या समोर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह काँग्रेसकडून मैदानात आहे. 


देशाच्या राजधानीतून मनोज तिवारी यंदाही बाजी मारणार?


लोकसभा निवडणुकांच्या 2019 च्या पर्वात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यांनी ईशान्य दिल्लीतील लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवली होती. यंदाही ते याच मतदारसंघातून मैदानात आहेत. पण यावेळी त्यांच्यासमोर कन्हैया कुमार यांचं तगडं आव्हान आहे. त्यामुळे मनोज तिवारी दुसऱ्यांदा विजयी होणार की कन्हैया कुमार बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


गोरखपुरमध्ये अभिनेता विरुद्ध अभिनेत्री  लढत


मागील अनेक दिवसांपासून एका वेगळ्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेले अभिनेते रवी किशन हे भाजपच्या तिकीटावर गोरखपूरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. गोरखपूर लोकसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगा आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचप्रमाणे 1998 ते 2017 अशी सलग पाच टर्म त्यांनी खासदारकी राखली होती. त्यातच 2019 मध्ये रवी किशन यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते जिंकूनही आले. यंदा देखील याच लोकसभा मतदारसंघातून रवी किशन लोकसभेच्या रिंगणात आहेत. दरम्यान यंदाची ही लढत फार लक्षवेधी ठरली. कारण या अभिनेत्यासमोर एका अभिनेत्रीचं आव्हान तयार झालं. गोरखपूर मतदारसंघातून रवी किशन यांच्याविरोधात समाजवादी पक्षाकडून काजल निषाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


ड्रीम गर्लची हॅट्रीक होणार?


बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री हेमा मालिनी या श्रीकृष्णाच्या जन्मभूमीतून म्हणजेच मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. मागील दोन टर्म खासदार राहिलेल्या हेमा मालिनी त्यांच्या विजयाची हॅट्रीक पूर्ण करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. त्यातच यंदा त्यांच्यासमोर काँग्रेस-सपा आघाडीचे उमेदवार मुकेश धनगर यांचं तगडं आव्हान आहे. 


अमोल कोल्हे शिरुरचा गड राखणार?


महाराष्ट्राचा निकाल हा यंदाच्या लोकसभेत देशासाठी निर्णायक ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच महाराष्ट्रात अनेक जागांवर अस्मिता निर्माण झालीये. महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपानंतर अनेकांनी भूमिका बदलल्या. पण अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थितीत राहणारे अमोल कोल्हे मात्र शरद पवारांच्या सोबतच राहिले. त्यामुळे शिरुरच्या मैदानातून पुन्हा अमोल कोल्हेंचं आव्हान तयार झालं. त्यांच्या विरोधात नुकतेच शिंदे गटात गेलेल शिवाजीराव आढळराव पाटील यांचं आव्हान आहे. 


पश्चिम बंगालमधून शत्रुघ्न सिन्हा मैदानात


लालकृष्ण अडवाणींपासून लोकसभेच्या मैदानात असलेले शत्रुघ्न सिन्हा हे यंदा देखील लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. 1992,1996,2009 आणि 2014मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढवली होती. पण त्यांनी 2022 मध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि यंदा ते तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून रिंगणात आहेत. दरम्यान या मतदारसंघात देखील एका अभिनेत्याला एका अभिनेत्याचच आव्हान असणार होतं. कारण भाजपकडून भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती, जी त्यांनी मागे घेतली. त्यानंतर या मतदारसंघातून भाजपकडून खासदार अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली.